Amol Mitkari : “दिलेला शब्द पाळला जाणे….”; अमोल मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांना करून दिली ‘त्या’ आश्वासनाची आठवण
Amol Mitkari : पोस्टमधून दिलेला शब्द पाळला जावा, एवढीच कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याची भावना अमोल मिटकरींनी व्यक्त केली आहे.

Amol Mitkari : उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याविषयी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या वादग्रस्त टिप्पनीनंतर याचे तीव्र पडसाद राज्यातील राजकीय वातावरणात उमटल्याचे बघायला मिळत आहेत.
काँग्रेसने सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करताना सुनेत्रा पवार यांचा ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केला होता. यानंतर मोठा वाद निर्माण झाला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तळागळातील कार्यकर्त्यांपासून ते बड्या नेत्यांपर्यंत संतापाची लाट उसळली आहे. या संपूर्ण प्रकरणावर पक्षाचे नेते आणि माजी आमदार अमोल मिटकरी यांनी देखील संताप व्यक्त केला होता.
अशातच अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी करत त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.
पोस्टमधून दिलेला शब्द पाळला जावा, एवढीच कार्यकर्त्यांची अपेक्षा असल्याची भावना अमोल मिटकरींनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनीही पक्षाच्या स्वाभिमानासाठी कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत ठामपणे पोहोचविण्यात पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
महायुती सरकार स्थापन होताना राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदरणीय अजितदादांकडे अर्थ खात्याची धुरा सोपविली होती,आणि आदरणीय दादांनी सुद्धा ती समर्थपणे पेलली.मात्र दादानंतर आदरणीय सुनेत्रा वहिनीकडे ही जबाबदारी अर्थसंकल्प मांडल्यावर देण्याची भावना… pic.twitter.com/m9HYsDVuG3
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 6, 2026
नेमकं काय म्हणाले अमोल मिटकरी? (Amol Mitkari)
“राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदरणीय अजितदादांकडे अर्थ खात्याची धुरा सोपविली होती आणि आदरणीय दादांनी सुद्धा ती समर्थपणे पेलली. दादानंतर आदरणीय सुनेत्रा वहिनीकडे ही जबाबदारी अर्थसंकल्प मांडल्यावर देण्याची भावना माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर बोलून दाखविली होती व तसा त्या खात्यावर हक्कही राष्ट्रवादीचाच! राज्यभरातील लाखो राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आजही आपल्या वचनपुर्तीची अपेक्षेने वाट पाहत आहेत.” असे अमोल मिटकरींनी देवेंद्र फडणवीसांना म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते ? (Amol Mitkari)
२८ जानेवारी या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. त्यांच्या पश्चात राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. याशिवाय राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचा मानही सुनेत्रा पवार यांना मिळाला. अशातच अजित पवार हयात असताना अर्थखातं राष्ट्रवादीकडे होते. त्यांच्या निधानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे खात आपल्याकडे ठेवून घेतलं. मागील अधिवेशनादरम्यान त्यांनी लवकरच अर्थखातं राष्ट्रवादीकडे दिले जाणार असल्याचे संकेत दिले होते. लवकरच या बाबत निर्णय जाहीर करू असंही ते म्हणाले होते. मात्र, अजूनही याबाबत निर्णय न झाल्याने अर्थखात्याचा मुद्या पुन्हा एकदा सोशल मीडियावरून थेट पोस्ट लिहून अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता याबाबत देवेंद्र फडणवीस काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.




