Rahul Kul: पुणे-दौंड रेल्वे मार्गाला ‘उपनगरीय’ दर्जा द्या; आमदार राहुल कुल यांची विधानसभेत आग्रही मागणी
Rahul Kul: पुणे-दौंड मार्गाला 'उपनगरीय' दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा रेल्वे मंत्रालयाकडे पत्रव्यवहार; राज्य शासनाने गतीने पाठपुरावा करण्याची विनंती.

Rahul Kul – पुणे जिल्ह्यातील आणि विशेषतः पुणे-सोलापूर महामार्गावरील आगामी काळातील भीषण वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता, पुणे – दौंड रेल्वे मार्गाला तातडीने ‘उपनगरीय’ (Suburban) दर्जा देऊन या मार्गावर पूर्ण क्षमतेने लोकल सेवा सुरू करण्यात यावी, अशी आग्रही मागणी दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी विधानसभेत केली. पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्याद्वारे त्यांनी हा प्रश्न सभागृहात प्रभावीपणे मांडला.
आमदार कुल यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, पुणे जिल्ह्यातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी शासनाने सोलापूर महामार्गावरील उड्डाणपुलासाठी ५ हजार ५०० कोटी रुपये आणि अहिल्यानगर रस्त्यावरील कामासाठी ७ हजार ५०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही कामे सुरू होत आहेत. मात्र, ही विकासकामे सुरू असताना पुढील २ ते ४ वर्षे या भागातील वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी मार्गासंदर्भात बैठक घेतली तरी रेल्वेचा पर्याय अधिक सक्षम ठरणार आहे. सोलापूर महामार्गाला समांतर पुणे-दौंड रेल्वे लाईन हा वाहतूक कोंडीवर सर्वोत्तम आणि वेगवान पर्याय ठरू शकतो. ते म्हणाले की, पुणे – दौंड रेल्वे मार्गाला तातडीने ‘उपनगरीय’ रेल्वेचा दर्जा द्यावा. मार्गावर स्थानिक प्रवाशांच्या सोयीसाठी इमू लोकल सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करावी,
सध्या सुरू असलेल्या डेमू, मेमू रेल्वे गाड्यांचे डबे ८ वरून १२ करावेत, आवश्यक ठिकाणी विशेष डब्यांची (महिला व दिव्यांग) सुविधा उपलब्ध करावी, इमू लोकल पूर्णपणे कार्यान्वित होईपर्यंत गर्दीच्या वेळेत सध्या सुरू असलेल्या मेमू आणि डेमू रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या वाढवून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी आक्रमकपणे रेटून धरली.
राज्य शासनाने पाठपुरावा करावा
आमदार राहुल कुल यांच्या मागणी नुसार या महत्त्वपूर्ण विषयाबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांकडे आधीच पत्रव्यवहार केला आहे. तसेच जिल्हा प्रशासनानेही यावर पावले उचलली आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या प्रस्तावाचा केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे तातडीने आणि गतीने पाठपुरावा करावा, अशी विनंती आमदार राहुल कुल यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सभागृहात केली. या रेल्वे सुविधेमुळे दौंड, पाटस, कुरकुंभ, केडगाव, यवत परिसरातील हजारो नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.






