Chandrashekhar Bawankule | नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जेडीयू हा पक्ष भाजप आणि इतर सर्व पक्षांना मागे टाकत बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. एनडीएने महागठबंधनवर आघाडी मिळवली आहे. त्यासोबतच कलांमध्ये तेजस्वी यादव यांची आरजेडी तिसऱ्या नंबरवर फेकल्याचे दिसून येते. यावर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाष्य करत काँग्रेसवर टीका केली आहे. काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे? “बिहारच्या जनतेने आम्हाला बहुमत दिलं आहे, कारण आम्ही विकासाचं राजकारण करत आहोत. काँग्रेस हा भविष्यात सर्वात छोटा पक्ष होणार आहे. मतदार याद्यांचे घोळ, ईव्हीएमचे घोळ हे दाखवून खोटं नरेटिव्ह परसवण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. मात्र नितीश कुमार आणि मोदींनी विकसित भारताचा मुद्दा मांडला. तर राहुल गांधींनी विकासावर काहीही चर्चा केली नाही त्यामुळे जनतेने त्यांना लाथाडलं आहे,” असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या विकास कामावर मतदारांनी शिक्कामोर्तब केला आहे. एवढं मोठं बहुमत इतिहासात कधीच मिळालेल नाही, तेवढं मोठं बहुमत बिहारमध्ये मिळत आहे. संपूर्ण देशावरच बिहारच्या निकालाचे परिणाम होईल.” यावेळी बावनकुळे यांनी बिहारच्या जनतेचे देखील आभार मानले आहेत. काँग्रेसला जनतेने नाकारले, काँग्रेस सर्वात छोटा पक्ष काँग्रेसवर टीका करत बावनकुळे यांनी म्हंटले की, “काँग्रेस रोजच संपत आहे, राहुल गांधी हतबल झाले आहेत. फक्त मतदार यादीचे चुकीचे मुद्दे समोर करून वेळकाढूपणा करत आहे. विकासाचा कुठलाच अजेंडा त्यांच्याकडे नाही. धर्म, जात पंथाचे राजकारण करणे हेच काँग्रेसचे काम आहे. काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर बसायला कोणी तयार नाही. काँग्रेसला जनतेने नाकारले आहे. काँग्रेसला बिहारमधून बाहेर काढले आहे. आगामी काळात काँग्रेस इतिहासातील सर्वात छोटा पक्ष होईल,” असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. ईव्हीएम आणि मतदार याद्यांवर वारंवार आरोप करण्याऐवजी काँग्रेसने आत्मचिंतन करावे, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच महाराष्ट्रातही आगामी काळात महायुतीला मोठा विजय मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. हेही वाचा: मोदींच्या हनुमानाने पुन्हा केला ‘गेम चेंज’ ; नितीशपासून तेजस्वीपर्यंत सर्वांनाच दिला धक्का, ‘एवढ्या’ जागांवर आघाडी