Rahul Gandhi: अर्थसंकल्पावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर चौफेर हल्लाबोल! काय म्हणले पाहा, सविस्तर….

Rahul Gandhi | Modi government | budget – लोकसभेतील विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्पावरून मोदी सरकारच्या कारभारावर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की आज संपुर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. देश आता “कमळाच्या आकाराच्या चक्रव्यूहात” अडकला आहे.
अभिमन्युला जसे चक्रव्युहात अडकवले गेले होते, तसेच आजही सहा जणांनी देशात हा चक्रव्युह तयार करून देशाला त्यात अडकवले आहे. हे सहा जण म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शाह , मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी,हे आहेत असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे देशातील शेतकरी, कामगार आणि तरुण घाबरलेल्या स्थितीत आहेत असेही ते म्हणाले.
लोकसभेत अर्थसंकल्पावर बोलताना ते म्हणाले की, गेल्या भाषणात मी काही धार्मिक संकल्पनांबद्दल बोललो होतो. भगवान शंकराची संकल्पना आणि अहिंसेची संकल्पना अशी आहे की त्रिशूल पाठीमागे ठेवलं जातं आणि हातात धरलं जात नाही.
मी शंकराच्या गळ्यातल्या सापाबद्दल बोललो होतो आणि हेही सांगितलं होतं की आपल्या देशातील धर्मांनी अहिंसेची कल्पना मांडली, ज्याला डरो मत या वाक्यात संकलित करता येईल. तथापी आज सरकारने पसरवलेली ही भीती इतकी खोलवर का पसरली आहे.
की भाजपमधील माझे मित्र घाबरले आहेत, मंत्री घाबरले आहेत, भारतातील शेतकरी घाबरले आहेत, आणि कार्यकर्ते आणि तरुण घाबरले आहेत. मोदींनी २१ व्या शतकात नवीन चक्रव्यूह तयार केला आहे आणि कमळाच्या आकारातील चक्रुव्युहात संपुर्ण देश सापडला आहे.
हजारो वर्षांपूर्वी, कुरुक्षेत्रात, सहा जणांनी अभिमन्यूला ‘चक्रव्यूह’मध्ये अडकवून त्याची हत्या केली. मी थोडे संशोधन केले आणि कळले की ‘चक्रव्यूह’ याला ‘पद्मव्यूह’ म्हणजे ‘कमळाची निर्मिती’ असेही म्हणतात. या चक्रव्युहात तरुण, शेतकरी, स्त्रिया, लहान आणि मध्यम उद्योग आजही सहा लोकांच्या ‘चक्रव्यूह’च्या केंद्रात आहेत.
नरेंद्र मोदी, अमित शाह , मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी,हे ते सहा लोक आहेत असे ते पुढे म्हणाले.यावेळी सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी राहुल गांधी म्हणाले की तुम्हाला जर आवडत नसेल तर मी सहा ऐवजी केवळ तीनच लोकांची नावे घेईन. जर तुम्हाला हवे असेल तर मी एनएसए, अंबानी आणि अदानी यांची नावे वगळून फक्त 3 नावे घेईन.
राहुल म्हणाले की, अर्थसंकल्पाने मध्यमवर्गाला धक्का दिला आहे, ज्या चक्रव्यूहाने भारत काबीज केला आहे, त्यामागे तीन शक्ती आहेत: प्रथम मक्तेदारी भांडवलाची कल्पना, म्हणजे संपूर्ण भारतीय संपत्ती दोन व्यक्तींना मिळावी यासाठी सुरू असलेला आटापीटा.
म्हणून चक्रव्यूहचा एक घटक आर्थिक शक्तीच्या एकाग्रतेतून येत आहे. दुसरा घटक म्हणजे सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग अशा केंद्रीय संस्था आणि तिसरा घटक राजकीय कार्यकारिणी हे चक्रव्यूहाचे केंद्रस्थान आहे आणि त्यांनी या देशाला उद्ध्वस्त केले आहे.
माझी अपेक्षा होती की हा अर्थसंकल्प या चक्रव्यूहाची शक्ती कमकुवत करेल, हा अर्थसंकल्प या देशातील शेतकऱ्यांना मदत करेल, या देशातील तरुणांना मदत करेल, मजुरांना आणि या देशातील छोट्या उद्योगांना मदत करेल.
पण मी पाहिले आहे की या अर्थसंकल्पाचा एकमेव उद्देश ही चौकट मजबूत करणे एवढाच आहे. ज्यांनी भारताला रोजगार दिला, त्या लहान आणि मध्यम उद्योगांवर नोटाबंदी, जीएसटी आणि कर दहशतवादाच्या माध्यमातून हल्ले झाले.
केंद्र सरकारने तयार केलेले चक्रव्यूह करोडो लोकांचे नुकसान करत आहे असे ते म्हणाले. पण आम्ही हे ‘चक्रव्यूह’ मोडून काढणार आहोत. तुम्हाला घाबरवणारा हा सर्वात मोठा मार्ग म्हणजे जात जनगणना. मी म्हटल्याप्रमाणे इंडिया आघाडी हे काम करेल.
या सभागृहात हमीभावाने कायदेशीर एमएसपी चा ठराव संमत करा तसेच जात जनगणना त्वरीत करा अशी मागणीही त्यांनी केली. अर्थसंकल्पातील इंटर्नशिप घोषणेवरूनही राहुल गांधींनी केंद्रावर टीका केली.





