नवी दिल्ली : भारताने कलम 370 हटवल्यानंतर जागतिक पातळीवर पाकिस्तानने हा मुद्दा घेवून गेला. पण पाकला यात यश आले नाही त्यामुळे त्यांच्याकडून नियंत्रणरेषेवर अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्याला भारतानेही चोख उत्तर दिले आहे. मात्र आता पाकिस्तानची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण भारताला 2 सप्टेंबर रोजी राफेल विमाने मिळणार आहेत. 2 सप्टेंबर रोजी फ्रान्सकडून 36 पैकी काही राफेल विमाने भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. यासाठी केंद्रीय सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह आणि हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ स्वत: फ्रान्सला जाणार आहेत.
2 सप्टेंबरला राफेल विमानांच्या पहिली तुकडी भारतीय हवाईदलाला सुपूर्द करण्यात येणार असल्याचे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. या विमानांचा ताबा घेण्यासाठी राजनाथ सिंह आणि हवाई दलाचे प्रमुख स्वत: उपस्थित राहणार आहेत. ही विमाने पारंपारिक पद्धतीने भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. राफेल विमानांना भारताच्या ताब्यात देताना दोन्ही देशांमधील प्रमुख अधिकारी उपस्थित असणार आहे. राफेल विमानांचा भारतीय हवाई दलामध्ये समावेश करुन घेण्यासाठी वैमानिकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. राफेल भारतात दाखल झाल्यानंतर त्याचा तत्काळ वापर करता यावा यासाठी हे प्रशिक्षण देण्यास मागील काही महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. तीन वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये हे वैमानिक प्रशिक्षण घेत आहेत. पुढील वर्षी मे महिन्यापर्यंत सर्व राफेल विमाने भारतामध्ये दाखल होणार आहेत.