Purandar News: ‘आमच्या जमिनी शिल्लक राहणार का?’ पुरंदरवर टॉवर लाईनचे संकट; १०० हून अधिक गावे बाधित होणार
Purandar News: मांढर, माहूर, नाथाचा डोंगर ते अतकरवाडी... पुरंदरमधील १५ हून अधिक गावांतून जाणार ४०० केव्हीची लाईन; जमिनी गमावण्याच्या भीतीने बळीराजा चिंतेत.

Purandar News – पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी यापूर्वीच पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी जाण्याच्या प्रक्रियेमुळे अडचणीत आलेल्या असताना आता तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आणखी एक मोठे संकट उभे ठाकले आहे. पुरंदर तालुक्यातून तब्बल 765 केव्ही आणि 400 केव्ही क्षमतेच्या महाकाय विद्युत वाहिन्या (टॉवर लाइन) जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक होण्याच्या तयारीत आहेत. आधी विमानतळ, त्यानंतर लॉजिस्टिक पार्क, आयटी पार्क यांसारख्या मोठ्या प्रकल्पांची चर्चा सुरू असतानाच आता उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांसाठी शेतजमिनींचा वापर होणार असल्याने ‘विकासाच्या नावाखाली पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या वाट्याला केवळ जमिनी गमावण्याचेच संकट का?’ असा संतप्त सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
765 केव्हीची महाकाय विद्युत वाहिनी तब्बल 100 हून अधिक गाव-वस्त्यांवर परिणामकारक ठरणार आहे. ‘पुणे-III के नरेंद्र-पुणे (GIS) 765 केव्ही H/C ट्रान्समिशन लाईनचा LILO’ या प्रकल्पासाठी पुरंदर तालुक्यातील अनेक गावांच्या हद्दीतून विद्युत वाहिनी जाणार असल्याची माहिती आहे. या मार्गात गाव-वस्त्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे या भागातील शेतजमिनी, पिके, विहिरी, फळबागा आणि भविष्यातील शेतीविकासावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
400 केव्हीची दुसरी लाईनही पुरंदरमधून
एकीकडे 765 केव्हीची लाईन प्रस्तावित असतानाच पुणे-III (GIS) S/S हिंजवडी-कोयना 400 केव्ही S/C लाईनचा LILO प्रकल्पही पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारा ठरत आहे. या 400 केव्हीच्या विद्युत वाहिनीचा मार्ग मांढर, धनकवडी, खंडोबा, नरसिंहपठार, तोंडल, माहूर, सिरसाटवाडी, शिंदेवाडी, जितकरवाडी, टोणपेवाडी, पळसपेठ, हरगुडे, नाथाचा डोंगर, अतकरवाडी आणि बेताल या गावांमधून जाणार असल्याची माहिती आहे.
‘आमच्या जमिनी नेमक्या किती प्रकल्पांसाठी द्यायच्या?’
पुरंदर तालुका हा शेतीप्रधान तालुका असून येथील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. विमानतळासाठी जमीन जाणार, लॉजिस्टिक पार्कसाठी जमीन लागणार, आयटी पार्कसाठी जमीन जाणार आणि आता उच्चदाब विद्युत वाहिन्यांसाठीही शेतजमिनींचा वापर होणार असेल तर सामान्य शेतकऱ्याने शेती करायची तरी कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘विकासाला आमचा विरोध नाही; मात्र विकासाची किंमत प्रत्येक वेळी शेतकऱ्यांनीच का मोजायची?’ असा सवाल शेतकऱ्यांकडून केला जात आहे. विमानतळाच्या भूसंपादनानंतर आता टॉवर लाईनचे नवे संकट उभे राहिल्याने पुरंदरचा शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात जाण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा यावर काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.






