Panjab Election : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शनिवारी पंजाबमध्ये (Panjab Election) सभा झाली. त्यावेळी त्यांनी अतिशय सूचक भूमिका मांडली. त्यामुळे पंजाबमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. आपची सत्ता असणाऱ्या पंजाबमध्ये वेळापत्रकानुसार पुढील वर्षीच्या फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या रणसंग्रामासाठी उण्यापुऱ्या वर्षाचा अवधी उरला आहे. त्यामुळे भाजप आतापासूनच तयारीला लागल्याचे शहा यांच्या सभेने अधोरेखित केले. त्या राज्यात भाजपचा फारसा राजकीय प्रभाव नाही. मात्र, शिरोमणी अकाली दल (एसएडी) या प्रादेशिक पक्षाशी युती करून भाजप अनेक वर्षे त्या राज्याच्या सत्तेतील भागीदार बनला. त्यावेळी मोठ्या भावाच्या भूमिकेत अर्थातच एसएडी राहिला. काही वर्षांपूर्वी दोन्ही पक्षांमधील युती तुटली. आगामी निवडणूक विचारात घेऊन ते पुन्हा एकत्र येतील असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, शहा यांनी सभेत बोलताना पुन्हा युती होण्याच्या शक्यतेला अप्रत्यक्षपणे पूर्णविराम दिला. भाजपने याआधी पंजाबमध्ये छोट्या भावाची भूमिका निभावली. आम्ही स्वबळावर सरकार स्थापन करू शकलो नाही. मात्र, भाजप पुढील निवडणूक स्वत:चे सरकार स्थापन करण्याच्या उद्देशातून लढवेल, असे ते म्हणाले. पंजाबने सरकार स्थापण्यासाठी आतापर्यंत कॉंग्रेस, एसएडी आणि आप या पक्षांना संधी दिली. आता भाजपला संधी दिली जावी. आम्ही पंजाबमध्ये परिवर्तन घडवू. भाजपला २०२४ यावर्षी पंजाबमध्ये १९ टक्के मतं मिळाली. तेवढ्या प्रमाणात मतं मिळालेल्या राज्यांत पुढील काळात भाजपचे सरकार आले. ओडिशा, आसाम, मणिपूर, उत्तराखंडमध्ये तसे घडले. आता तशी वेळ पंजाबमध्ये येईल, असा विश्वासही शहा यांनी व्यक्त केला.