Pune ZP Election – केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील विविध गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी आशिर्वाद पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी थेट संवाद साधला. या दौऱ्यात नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेत असतानाच पक्षाचा पाठिंबा वाढत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि विश्वास या पदयात्रेच्या निमित्ताने नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. या पदयात्रेमध्ये केसनंद, वाडेबोल्हाई, शिरसवडी, बिवरी, आष्टापूर, न्हावी सांडस, सांगवी सांडस, शिंदेवाडी, जगतापवाडी, हिंगणगाव, खामगाव टेक, टिळेकरवाडी, कोरेगाव मूळ, प्रयागधाम, नायगाव आणि पेठ या गावांचा समावेश होता. या दौऱ्यात जिल्हा परिषद उमेदवार सुरेखा हरगुडे यांच्यासह केसनंद-वाडेबोल्हाई पंचायत समिती गणाचे उमेदवार प्रमोद चंद्रकांत हरगुडे आणि कोरेगाव मूळ गणाचे उमेदवार कृषिराज दत्तात्रेय चौधरी उपस्थित होते. जिल्हा परिषद पुणे या तिन्ही उमेदवारांनी घराघरांपर्यंत पोहोचून लोकांच्या दैनंदिन अडचणी समजून घेतल्या आणि लोकसहभागातून विकास साधण्याची भूमिका मांडली.पदयात्रेतील प्रतिसादाबद्दल बोलताना प्रमोद हरगुडे यांनी सांगितले की, नागरिकांचा विश्वास हीच आमची ऊर्जा आहे. तर कोणतीही औपचारिक सभा नसतानाही नागरिकांनी दिलेला प्रतिसाद लक्षवेधी असल्याचे कृषिराज चौधरी यांनी नमूद केले.या पदयात्रेमुळे उमेदवारांचा आत्मविश्वास उंचावला असून, महिला, युवक आणि ज्येष्ठांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या सक्षम आणि तत्पर उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “पदयात्रेतून आम्ही थेट जनतेच्या दारात पोहोचलो. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना समजून घेत विकास आराखडा त्यांना समजावला. प्रत्येक पावलामागे सेवा, प्रत्येक भेटीत विश्वास आणि प्रत्येक संवादात आशा होती. महिलांचा, युवकांचा आणि ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला. ही पदयात्रा म्हणजे केवळ प्रचार नव्हे, तर लोकांच्या मनाशी नातं जोडण्याची चळवळ आहे. जनतेच्या आशीर्वादाने आणि सहकार्याने आम्ही परिवर्तनाची ही वाटचाल अधिक जोमाने समृद्ध, सुरक्षित आणि सशक्त भविष्याच्या दिशेने पुढे नेत आहोत.” – प्रमोद चंद्रकांत हरगुडे, उमेदवार केसनंद वाडेबोल्हाई गण