Pune Traffic Jam – सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून तब्बल ११८ कोटी रुपये खर्चून राजाराम पूल ते फनटाइम असा तब्बल दोन किलोमीटरचा उड्डाण पूल बांधला आहे. यामुळे सिंहगड रस्त्यांवरील वाहनांचा वेग वाढला असला, तरी सकाळच्या वेळी कामासाठी जाण्यासाठी या पुलाचा वापर करणाऱ्या पुणेकरांना मात्र दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. राजाराम पूल चौकात कर्वेनगरकडे वळताना रस्ता अडवून थांबलेल्या रिक्षा, तसेच पूल ओलांडल्यानंतर पुढे मातोश्री वृद्धाश्रमाच्या समोर वाहतूक पोलिसांकडून नियमित वाहतूक नियमन होत नसल्याने दररोज सकाळी नऊ ते ११ पर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत. परिणामी उड्डाण पुलामुळे वाचलेला वेळ पुढे या कोंडीत वाया जात असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. एकीकडून सुटले.. दुसरीकडे अडकले सिंहगड रस्त्यावरील नवीन पुलावरून राजाराम पूल चौकात आल्यानंतर ७५ टक्के वाहने कर्वेनगरकडे वळतात, तर २५ टक्केच वाहने स्वारगेटकडे जातात. मात्र, पूल ओलांडल्यानंतर मातोश्री वृद्धाश्रमासमोर कर्वेनगरमध्ये जाणारी वाहने, तसेच बाहेर येणारी वाहने महालक्ष्मी लाॅन्स आणि हाॅटेल गिरिजासमोरून येतात. अशा वेळी सिंहगड रस्त्यावरून येणारी वाहने आणि कर्वेनगरकडून येणारी वाहने आमने सामने येतात. सिहगड रोड वाहतुक कोंडी परिणामी वाहतुकीची गती मंदावते. त्यातच या रस्त्यावर बंदी असतानाही मोठे डंपर, तसेच हाॅटमिक्सची वाहतूक करणारे ट्रक चक्क वाहतूक पोलिसांच्या समोरून ये- जा करूनही त्यांना अडविले जात नाही. आधीच रस्ता छोटा असल्याने ही वाहने मध्येच आल्यानंतर वाहनांचा वेग मंदावतो. १०० मीटर रस्त्यावर तीन पोलीस, तरी कोंडी मातोश्री वृद्धाश्रम चौकात कोंडी फोडण्यासाठी अवघ्या १०० मीटर अंतरात तीन पोलीस नियुक्त केलेले असतात, तरीही कोंडी फुटत नसल्याचे चित्र आहे. यातील एक पोलीस महालक्ष्मी लाॅन्सकडे जाणाऱ्या वाहनांचे नियमन करतात, तर एक पोलीस कर्वेनगरमधून आलेल्या वाहनांना सिंहगड रस्त्याकडे जाण्यासाठी नियमन करतात. एक पोलीस डीपी रस्त्याने आल्यानंतर हाॅटेल गिरिजाच्या समोरून कर्वेनगरमध्ये जाणारी, तसेच कर्वेनगरमधून पुलाकडे येणाऱ्या वाहनांचे नियमन करतात. मात्र, पोलीस नियमनापेक्षा अनेकदा मोबाइलमध्येच दंग असतात. अनेकदा वाहनचालक मध्येच वाहने घालतात. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या रस्त्यावर कोंडी होते. हे चित्र दररोजचे आहे. “पूल झाल्यामुळे चार सिग्नलचा वेळ वाचला आहे. मात्र, राजाराम पूल ते डीपी रस्त्यापर्यंत जाताना पुलावरच वाहतूक कोंडी होते. त्यात वाचलेला वेळ वाया जातो. हा त्रास रोजचाच झाला असून, महापालिका आणि पोलिसांनी त्यावर काहीतरी उपाययोजना करणे आवश्यक आहे.” – दीपक महाडीक (नागरिक)