Pune News – शहराचे पश्चिम प्रवेशद्वार असलेल्या आणि कोकण तसेच मुळशीकडे जाण्यासाठी महत्त्वाच्या चांदणी चौक ते पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेकडून मोठा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. चांदणी चौक ते भूगाव (रामनदीपर्यंत) हा रस्ता ६० मीटरपर्यंत रूंद करण्यासोबतच उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग उभारले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील तीन वर्षांत अंदाजपत्रकात तरतूद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. यावर शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे. २०२५-२६ च्या अंदाजपत्रकात यासाठी १६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, त्यातून सल्लागार नेमणूक आणि आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रकल्प टप्पा १ आणि टप्पा २ अशा दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. टप्पा १ साठी ६७.८५ कोटी, तर टप्पा २ साठी १३५.७६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा निधी ७२ ब अंतर्गत उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. सध्या चांदणी चौक ते भूगावदरम्यानचा रस्ता अनेक ठिकाणी केवळ १० मीटर रुंद आहे. पुणे महापालिका वाढती वाहनसंख्या आणि परिसरातील लोकसंख्या लक्षात घेता हा रस्ता ६० मीटर रुंद असणे आवश्यक आहे. अरुंद रस्त्यामुळे सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. असे होईल काम : पीव्हीपीआयटी कॉलेज चौकात ४३० मीटर लांबीचा ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार असून, त्यातील १२० मीटर भाग आरसीसी संरचनेचा असेल. २३.२ मीटर रुंदीच्या या कामासाठी सुमारे २७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. एम्ब्रोसिया चौक व पाटीलनगर चौकात ८७० मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, त्यातील ५४४ मीटर भाग आरसीसी असेल. या पुलासाठी सुमारे ८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर चांदणी चौक ते भूगावदरम्यानचा प्रवास वेळ कमी होणार आहे. राम नदीवर ३० मीटर लांबीचा आणि ७० मीटर रुंदीचा पूल उभारण्यात येणार असून, नदी ओलांडताना होणारी कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. भविष्यातील कोंडीही टळणार हा मार्ग कोकणात जाण्यासाठी सर्वात जवळचा असून, पिरंगुट, रोहा, भागड, माणगाव यांसारख्या औद्योगिक भागांना तसेच हिंजवाडी आयटी पार्कला जोडणारा महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. परिसरात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था असून नव्या संस्थाही प्रस्तावित आहेत. त्यामुळे भविष्यात वाहतूक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पश्चिम पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल होण्याची अपेक्षा असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे.