Pune News – खडकवासला प्रकल्पाची पाणीपट्टीची तब्बल ९४८ कोटी रुपयांची थकबाकी येत्या सोमवारपर्यंत (दि. २३) जमा न केल्यास मंगळवारपासून (दि. २४) शहराचा पाणीपुरवठा तोडण्याचा निर्वाणीचा इशारा जलसंपदा विभागाने दिला आहे. पाणीपट्टीच्या थकबाकीवरून आता पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यात जुंपली असून, शहरावर पाणीबाणीचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी दिले जाते. यासाठी जलसंपदा विभागाने ११.६० टीएमसी पाणीकोटा मंजूर केला आहे. मात्र, महापालिका या कोट्याव्यतिरिक्त दरवर्षी किमान आठ ते साडेआठ टीएमसी अतिरिक्त पाणी वापरते. त्यामुळे महाराष्ट्र जलसंपत्ती निमयन प्राधिकरणाच्या निकषांनुसार मंजूर कोट्याव्यतिरिक्त जादा पाणीवापराला दंडासह पाणीपट्टी आकारली जाते. त्यानुसार महापालिकेकडे दरवर्षी किमान ३०० कोटी रुपयांची पाणीपट्टी देणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांची आकडेवारी बघता महापालिकेले ही रक्कमही भरलेली नाही. त्यामुळेच पाणीपट्टीची आणि दंडाची थकबाकी ९४८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. महापालिकेसोबत झालेल्या करारानुसार नदीत सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्यावरही प्रक्रिया करणे आवश्यक आहे. मात्र, हे १३ टीएमसी पाणी प्रक्रिया न करताच सोडण्यात येते. त्यामुळे त्यावरही महापालिकेला दंड लावण्यात येत आहे. महापालिका हा दंड भरत नसल्याने थकबाकी वाढत असल्याचा दावा जलसंपदा विभाग केला आहे. आता या विभागाने ही थकबाकी भरण्यासाठी यापूर्वी दोन वेळा नोटीस बजावली आहे, तरीही महापालिकेने केवळ ९७ कोटी रुपये जमा केले आहेत, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.