प्रभात वृत्तसेवा पुणे – विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकत राहून प्रामाणिकपणा व नैतिकतेचे मूल्य जपले पाहिजे. विद्यार्थ्यांनी नवनिर्मिती करत नेतृत्वही स्वीकारले पाहिजे, तसेच समाजसेवेसाठी शिक्षणाचा वापर करण्याची आवश्यकता आहे, असे मत राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंचाचे अध्यक्ष प्रा. अनिल सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.जेएसपीएम विद्यापीठाच्या पहिल्या पदवीदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. तानाजी सावंत, जेएसपीएम विद्यापीठ अध्यक्ष डॉ. रवी जोशी, कुलगुरू प्रा. बी. बी. आहुजा, निबंधक विशाल चौधरी, डॉ. अजित थेटे, डॉ. दत्तात्रय भिसे, डॉ. अनुराधा देशपांडे, डॉ. पी. पी. विटकर, डॉ. एस. बी. निमसे, डॉ. देवानंद शिंदे, डॉ. अनिल भोसले, वाघोली कॅम्पसचे संचालक डॉ. वसंत बुगडे आदी उपस्थित होते. चार सुवर्णपदक विजेत्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले. पदवीदान हा केवळ समारंभ नसून तो ज्ञानाचा उत्सव, गुरू-पालकांप्रती कृतज्ञतेचा क्षण आणि नव्या प्रवासाची घोषणा असते, असे स्पष्ट करून प्रा. सहस्रबुद्धे म्हणाले, की भारतीय संस्कृतीशी नाते ठेवून जागतिक नागरिक बनावे. जेएसपीएम विद्यापीठाच्या पहिल्या बॅचच्या पदवीधरांची कामगिरी पुढील पिढ्यांसाठी दिशा दाखवेल.शिक्षण हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसावे. आमचे ध्येय नेहमीच संशोधन, उद्योग जगताशी संबंध, नवकल्पना आणि उद्योजकता यावर आधारित राहिले आहे. विद्यार्थी फक्त नोकरी करणारे न राहता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनावेत हाच प्रयत्न आहे, असे प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.