वानवडी – पुणे शहराकडून येताना वानवडीत प्रवेश करण्याचे महत्वाचे ठिकाण म्हणजे सोलापूर महामार्गावरील फातिमा नगर चौक. दररोज हजारो वाहने याच चौकातून वानवडीत प्रवेश करतात, वानवडीच्या अर्थव्यवस्थेला चालना देतात, वानवडीकरांना उत्तम दळणवळणाची सुविधा देतात. मात्र, प्रशासनाने काहीही कारण नसताना याठिकाणी उजवीकडे वळण बंद केल्याने वाहनचालकांना मोठा वळसा घ्यावा लागत आहे. याबाबत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने फातिमानगर चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. पुणे शहरातून येणाऱ्या वाहनांना जवळपास ५०० मीटर पुढे जाऊन पुन्हा यू-टर्न घेऊन ५०० मीटर परत यावे लागते. वानवडीकरांवर याचा फार मन:स्ताप होत आहे. याचा तीव्र निषेध करण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने फातिमा नगर चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. प्रशांत जगताप यांच्यासह केवीन मॅन्युअल, प्रफुल्ल जांभुळकर, आविनाश काळे, प्रकाश भंडारी, रवि परदेशी, रमीज सय्यद, आशा शिंदे, रोहित साळवे, तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि असंख्य वानवडीकरांनी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी घोषणा देत प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.