Pune Mumbai ST Bus: पुणे-मुंबई प्रवाशांना मोठा फटका! घाटात दरड कोसळल्याने एसटीच्या १७० फेऱ्या रद्द
Pune Mumbai ST Bus: मुंबई-पुणे महामार्गावरील घाट परिसरात दरड कोसळल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून एसटी प्रशासनाचा मोठा निर्णय; हजारो प्रवाशांना मनस्ताप.

Pune Mumbai ST Bus – मुंबई- पुणे महामार्गावरील घाट परिसरात दरड आणि खांब कोसळल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून पुणे आणि मुंबई दरम्यानची सर्व एसटी बस सेवा सोमवारी (दि. ६) बंद ठेवण्यात आली. त्यामुळे स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या व मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या प्रवाशांना स्थानकावरच बसून राहावे लागले. मुंबई आणि पुणे दरम्यान दररोज एसटी महामंडळाच्या सुमारे १८० फेऱ्या चालवल्या जातात. हजारो नोकरदार,
व्यावसायिक आणि सर्वसामान्य प्रवासी या बसेसमधून दैनंदिन प्रवास करतात. मात्र, सोमवारी मुसळधार पावसामुळे दिवसभरातील १८० फेऱ्यांपैकी तब्बल १७० हून अधिक फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून, हजारो प्रवाशांना आपला प्रवासाचा बेत ऐनवेळी रद्द करावा लागला आहे. पहाटे काही गाड्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
मात्र, काही तासांनी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झालेल्या एसटी महामंडळाच्या चार बसेस उर्से टोलनाका परिसरात पोहोचल्या असता, पुढे घाटात मोठी दरड कोसळल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यामुळे या बसेसना पुढे जाण्यास मज्जाव करण्यात आला. प्रशासनाने तातडीने या चारही बसेस सुरक्षितपणे पुन्हा पुण्याच्या दिशेने परत बोलावल्या. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील संभाव्य धोका टळला आहे.
“पुणे-मुंबई महामार्गावरीत घाटात मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा साचला असून, मुसळधार पाऊस आणि धुक्यामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. वाहतूक सुरळीत होण्यास वेळ लागणार असल्याने, नागरिकांनी पुढील सूचना मिळेपर्यंत मुंबई-पुणे मार्गावरील प्रवास पूर्णपणे टाळून सहकार्य करावे.”
– कमलेश धनराळे, विभागीय वाहतूक अधिकारी, स्वारगेट





