Pune Kothrud Crime : कोथरुड पोलिस ठाण्यात मुलींचा छळ अन् जातीवाचक शिवीगाळ? रोहित पवार, सुजात आंबेडकरांचा रात्री साडेतीनपर्यंत ठिय्या; काय आहे प्रकरण?

Pune Kothrud Crime : पुण्यातील कोथरुड पोलिस ठाण्यात जबरदस्तीने बोलावून मारहाण करत गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पोलिसांवर करण्यात येत आहे. श्वेता एस व्ही यांनी कोथरुड पोलिस ठाण्याच्या बाहेरून फेसबुक लाईव्ह करत पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र, पोलिसांंनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच रविवारी (दि. ०३) रात्री साडेतीन वाजता आमदार रोहित पवार, सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर, सहकारी आणि या मुली पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले. अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी या सगळ्यांची पहाटेपर्यंत चर्चा सुरु होती. तरीही पोलिसांनी अद्याप याप्रकरणात गुन्हा दाखल केला नाही.
मात्र, शहरातील अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी याप्रकरणात लक्ष घातल्याने मुलींचा छळ करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यासाठीचा दबाव वाढला आहे. दरम्यान, राज्य महिला आयोगानेही याप्रकरणाची दखल घेतल्यामुळे सोमवारी दिवसभरात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
याप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, छत्रपती संभाजीनगर येथील एका व्हीआयपी केसच्या तपासासाठी आलेल्या तेथील पोलिसांसह कोथरुड पोलिसांनीही पुण्यातील मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करून त्यांना मारहाण केली.
याबाबत संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची दोन दिवस मागणी करुनही पोलिस त्याची दखल घेत नाहीत, याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांसह संबंधित मुली पुणे पोलिस आयुक्तालयात दिवसभर बसून आहेत, तरीही पोलिस त्यांची दखल घेत नाहीत. या मुलींना भेटून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.
मागासवर्गीय मुलींवर जातीवाचक शेरेबाजी करणाऱ्या आणि त्यांना मारहाण करणाऱ्या कोथरुडसह छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि संबंधित व्हीआयपी केससाठी दबाव कुणी आणला, संबंधित निवृत्त पोलिस अधिकारी कोण आहे? झिरो पोलिस असलेली महिला, या सर्वांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर येथील एक विवाहित महिला सासरच्या त्रासाला कंटाळून पुण्यात कोथरुडमध्ये राहणाऱ्या तीन मैत्रिणींकडे एक दिवसासाठी आली होती. संबंधित महिलेची हरवल्याची तक्रार संभाजीनगरमध्ये दाखल करण्यात आली होती.
पोलीस तिचा मोबाईल ट्रक करत कोथरुडपर्यंत पोहचले. त्यांनी या तीन मुलींच्या फ्लॅटवर जाऊन चौकशी केली. यानंतर पोलिसांनी या तिघींना ताब्यात घेऊन कोथरुड पोलीस ठाण्यात नेले. येथील रिमांड रुममध्ये पोलिसांनी या तिन्ही मुलींचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
कोथरुड पोलिसांनी आरोप फेटाळले
मात्र, पोलिसांकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले असून पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी या प्रकरणात तथ्य असेल तर कारवाई करु, असं सांगितल आहे. त्यामुळे आता पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि पोलीस उपयुक्त संभाजी कदम हे काय कारवाई करतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.





