Pune hooch tragedy : पुणे दारूकांडात मोठी अपडेट! CID ची १० पथके मैदानात; मुख्य सूत्रधाराचे ‘ठाणे’ कनेक्शन आले समोर
Pune hooch tragedy : दापोडी आणि हडपसर विषारी दारूकांडानंतर राज्य यंत्रणा अॅक्शन मोडमध्ये; मुख्य साखळीचा उलगडा करण्यासाठी सीआयडीने तैनात केली १० विशेष पथके.

Pune hooch tragedy – दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारूकांडानंतर राज्य यंत्रणा पूर्णपणे अॅक्शन मोडमध्ये आली आहे. अनेकांचा बळी गेलेल्या या गंभीर प्रकरणाचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला असून, गुन्ह्याच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी सीआयडीने तब्बल १० विशेष पथके नियुक्त केली आहेत. या तपासादरम्यान विषारी मेथेनॉलचा पुरवठा करणाऱ्या मुख्य साखळीचा उलगडा झाल्याची माहिती समोर आली आहे.
सीआयडीने तपासाची व्याप्ती वाढवत विविध जिल्ह्यांतील धागेदोरे जोडण्यास सुरुवात केली आहे. दापोडी प्रकरणातील सर्व सहा आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत आकाश जाधव, इरफान निसार कुरेशी आणि आर्यन संजय धोत्रे यांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींची सीआयडीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे.
या प्रकरणाचे धागेदोरे ठाण्यापर्यंत पोहोचल्याने तपासाला नवे वळण मिळाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ठाण्यातील नारपोली पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल केला असून, त्या गुन्ह्यातील आरोपींनाही सीआयडी तपासात समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सीआयडीकडून घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज, जप्त केलेल्या दारूचे नमुने आणि इतर महत्त्वाचे पुरावे तपासले जात आहेत.
नमुने पुण्यातील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. आरोपींचे मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहार आणि संपर्क साखळीची छाननी सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, एफडीए आणि सीआयडी यांच्यात समन्वय ठेवून पुराव्यांची मजबूत साखळी उभारली जात आहे.
दरम्यान, या संवेदनशील प्रकरणाबाबत नागरिकांकडे कोणतीही माहिती असल्यास ती पोलीस उपअधिक्षक शामराव काळे (मोबाइल ८२३७२२९२०८) आणि पोलीस उपअधिक्षक सचिन चव्हाण (मोबाइल ९०११३३४५८०) यांच्याशी संपर्क साधून तपास यंत्रणेला मदत करण्याचे आवाहन सीआयडीकडून करण्यात आले आहे. या प्रकरणातील प्रत्येक दुवा तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.






