पुणे जिल्हा : यशवंत, घोडगंगा साखर कारखाना सुरू करणार

अजित पवार : माऊली कटके यांच्या प्रचारार्थ लोणी काळभोरमध्ये सभा
लोणी काळभोर – थेऊर येथील यशवंत व शिरूर तालुक्यातील घोडगंगा हे दोन्ही सहकारी साखर कारखाने सुरु करणार आहे. तसेच सोलापूर व अहिल्यानगर महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवणार आहे. पूर्व हवेलीसाठी हडपसर महानगरपालिकेचे नियोजन आगामी काळात नागरिकांना विश्वासात घेऊन करणार असल्याचे सूतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांच्या प्रचारानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील खोकलाई देवी चौकात शनिवारी (दि.९) दुपारी सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संचालक प्रदीप कंद, सुरेश घुले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष मोरेश्वर काळे, दादा पाटील फराटे, प्रशांत काळभोर, राष्ट्रवादीचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, लोणी काळभोरच्या सरपंच सविता लांडगे, वैशाली नागवडे, पूनम चौधरी, नंदू काळभोर, चित्तरंजन गायकवाड, योगेश काळभोर, संतोष कांचन, प्रवीण काळभोर, अमित कांचन, जितेंद्र बडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार म्हणाले, सोलापूर व नगर महामार्गा वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अनुक्रमे यवत व शिक्रापूर गावापर्यंत चार मजली उड्डाणपुल, तर उरुळी कांचन व वाघोली पर्यंत मेट्रो नेण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती थेऊर येथील ‘यशवंत’च्या जागेत सुरु करू. हवेलीच्या पूर्व भागासाठी हडपसर महानगर पालिकेचे नियोजन आहे. परंतु, यासाठी समाविष्ट गावातील नागरिकांना विश्वासात घेऊन निर्णय घेण्यात येईल.
पवार म्हणाले की, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, उरुळी कांचन व वाघोली या गावातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता. या ग्रामपंचायती नगरपंचायतीच्याही पुढे गेल्या आहेत. पालिका, नगरपालिका, नगर पंचायत व नगर परिषद यांना ग्रामपंचायत पेक्षा जास्त निधी मिळतो. त्यामुळे या भागाच्या विकासासाठी येथील जनतेचा होकार असल्यास, या भागासाठी हडपसर महानगरपालिकेचे नियोजन आहे.
पवार म्हणाले की, यशवंत कारखान्याची २२५ एकर जागा आहे. या जागेपैकी १०० एकर जागेमध्ये अत्याधुनिक पद्धतीची बाजार समिती व राहिलेल्या जागेमध्ये यशवंत कारखाना नव्याने सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची मदत घेऊ. विकासकामासाठी कोठेही कमी पडणार नाही. विरोधकांच्या खोट्या अफवांना बळी पडू नका. मला जर कारखाना बंद पाडायचा असता तर घोडगंगा कशाला वेंकटेश बंद पाडला असता. बंद पडलेला कारखाना मुलाच्या हाती दिला आहे. कसा तो तरी चालू करणार ? मी काही जास्त बोलणार नाही. परंतु तुम्हा सर्वांना माहिती आहे. भावकी कशी असते ते.
उमेदवार ज्ञानेश्वर कटके म्हणाले की, अजित पवार यांनी शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात मला उभा राहण्याची संधी दिल्याबद्दल सर्वात प्रथम त्यांचे आभार मानतो. शेतकरी, नोकरदार व कामगार वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मतदार संघात पाहिजे तेवढा विकास झाला नाही. त्यामुळे जनता विद्यमान आमदारावर नाराज आहे. सर्व समस्या सोडविण्याची ताकद फक्त आपल्यामध्ये आहे.
माऊली कटके श्रावण बाळ- आढळराव
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात विकासाच्या शब्दाला जागणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित पवार होय. कष्टकरी, शेतकरी, मजूर, पाणी पुरवठा योजना, लाडकी बहिण योजना, मुलींच्या शिक्षणासाठी मदत आदी अनेक विकासाच्या योजना राबविल्या आहेत. सध्या राजकारणामध्ये खूप गोंधळ झाला आहे. कुणी कोणाची कामे चोरायची आणि दुसऱ्याने आणलेल्या कामावर आपली लेबल लावायची. खामगाव टेक येथील नदीवरील पूल मंजूर करून आणला. मात्र विद्यमान आमदाराने पुलाच्या कामाचे उद्घाटन करून कामाचे श्रेय घ्यायचे. पण सत्ता असो अथवा नसो आम्ही मतदारसंघात विकासकामे केली आहेत. माऊली उर्फ ज्ञानेश्वर कटके यांनीही श्रावण बाळाची भूमिका बजावली आहे, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.





