पुणे जिल्हा : शेकडो स्वामी भक्तांना महाप्रसादाचा लाभ

वालचंदनगर – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्तजयंती निमित्त मंगळवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमानंतर शेकडो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून, न्यासाकडून सुरु असलेल्या समर्थ महाप्रसाद दोन वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून लाभार्थ्यांना हिवाळा असल्याने स्वेटरचे वाटप करण्यात आले.
दरम्यान अनिल पाटील व संगीता पाटील ठाणे या दांपत्य, देणगीदारासमवेत महानैवेद्य, आरती संपन्न झाल्यानंतर न्यासाने सुरु केलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला श्रीदत्त जयंतीच्या या दिवशी दोन वर्ष पूर्ण झाले. दररोज 260 निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा समर्थ महाप्रसाद’ डबा घरपोच दिला जातो. याप्रसंगी गेल्या दोन वर्षापासून ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता निर्धारित वेळेत लाभार्थ्यांना डबा पोहच करणारे सेवेचे व्यवस्थापक अतिश पवार, अंकुश चौगुले, सेवेकरी सागर पवार,
अक्षय टोणपे, सिद्धेश्वर जाधव, शिवराज मलवे यांचा अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र देऊन मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी अनिल पाटील व संगीता पाटील ठाणे यांच्या हस्ते संकल्प सोडल्यानंतर महाप्रसादास सुरवात करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार न्यासाचे सदस्य अरविंद शिंदे यांनी मानले.
लाभार्थ्यांना स्वेटरचे वाटप
गेल्या वर्षभरापासून न्यासाकडून दररोज 260 निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा समर्थ महाप्रसाद डबा घरपोच दिला जातो. अशांनकरिता आजच्या श्रीदत्त जयंती निमित लाभार्थ्यांना महाप्रसादा बरोबरच स्वेटरचे वाटप महेश माळी व दतात्रय पाटील आणि त्यांच्यासमवेत उपस्थित नैवेद्याचे श्रीभक्त, देणगीदार यांच्या हस्ते करण्यात आले. लाभार्थ्यांना शहरातील विविध ठिकाणाहून अन्नछत्र मंडळात आणण्यात आले.
भूकमार थांबली
अक्कलकोट शहरातील गरजू, वृद्ध, दिव्यांग, निराधार लोक आम्ही या अगोदर उपाशी राहून दिवस काढलो आहोत; मात्र श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या संकल्पनेतून व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेमुळे आमच्यासारख्यांची भूकमार थांबल्याचे लाभार्थी शिवशंकर गंगनळ्ळी व सिद्धराम घंटे यांनी सांगितले.





