पुणे जिल्हा: ‘भीमाशंकर’ देणार 3,100 रुपये दर; दिलीप वळसे पाटलांचा वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांना दिलासा

मंचर/पारगाव शिंगवे – पारगाव दत्तात्रय नगर (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर कारखान्याकडून उसाचा अंतिम दर 3 हजार 100 रुपये मॅट्रिक टनाप्रमाणे बाजारभाव देण्यात येणार असून, पुढील काही दिवसांत कारखान्यात इथेनॉल प्रकल्प सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात असलेला बाजारभाव देण्यासाठी कारखाना बांधील आहे, अशी ग्वाही सहकार मंत्री आणि भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
पारगाव दत्तात्रय नगर येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची 27 वी वार्षिक सभा मंगळवार (दि. 26) भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील बोलत होते. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार पोपटराव गावडे, शरद सहकारी बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विष्णू हिंगे, मानसिंग पांचूदकर, विवेक वळसे पाटील, वसंतराव भालेराव, प्रदीप वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, पांडुरंग पवार, शंकरशेठ पिंगळे, सुभाषराव मोरेमारे, संजय गवारी, रमेश लबडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे, शिरीष सुर्वे, किशोर तिजारे, राजेश वाकचौरे, दिलीप कुरकुटे यांसह कारखान्याचे संचालक, अधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
कारखाना उत्तमरीत्या काम करत असून लेखा परीक्षण अहवालात कारखान्यास अ ऑडिट वर्ग मिळाला असल्याचे बेंडे पाटील यांनी सांगितले. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी कारखान्याच्या प्रगतीचा आढावा मांडला. कारखान्याचे संचालक देवदत्त निकम यांनी विविध प्रश्न उपस्थित करून ती सोडवण्याची मागणी केली. अशोक करंडे, अरुण ढोमे, विठ्ठल ढगे पाटील, बळवंत बोबे, तुकाराम गावडे यांनी चर्चेत भाग घेतला. अहवाल वाचन कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. सुदाम खिलारी यांनी, तर उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी आभार मानले.
उर्वरित 350 रुपये दिवाळीपूर्वी
2022 -23 गाळप हंगामात गाळप झालेल्या उसासाठी 2751 रुपये प्रति मॅट्रिक बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. उर्वरित 350 रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार असून, त्यामध्ये 50 रुपये भाग विकास निधीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. या पूर्वी शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा उसाचा दर जादा दिल्यास वरील उत्पन्न हे कारखान्याचे समजून कारखान्यांना त्या रकमेचा इन्कमटॅक्स भरावा लागत होता. मात्र आता केंद्र शासनाने इन्कम टॅक्स माफ केला आहे. त्यामुळे भविष्यात जादा दर देताना अडचण येणार नाही. मागील वर्षी एकूण 14 लाख 60 हजार 256 क्विंटल साखर विकली गेली असून 5 लाख 40 हजार 450 क्विंटलची साखर निर्यात केली.
“सोमेश्वर, माळेगाव कारखान्यांनी जो दर दिला तो दर भीमाशंकर कारखान्याने द्यावा, अशी मागणी केली जात आहे. मात्र इतर कारखान्यांशी आपली तुलना करणे योग्य नाही. त्या कारखान्यांमध्ये व आपल्या कारखान्यांमध्ये फरक असून माळेगाव कारखान्याकडे इथेनॉल प्रकल्प असल्याने त्यांचे उत्पन्न जास्त आहे. माळेगाव, सोमेश्वर कारखाना सभासदांना वेगळा दर देतात, तर बाहेरून ऊस घेऊ न येणाऱ्यांना वेगळा दर देतात. मात्र, भीमाशंकर सर्वांना एकच दर देतो.” – वळसे पाटील, सहकार मंत्री





