Pune District : बारामती ॲग्रीकल्चरल राज्यात पथदर्शी

डॉ. अनिल काकोडकर : टेक्नॉलॉजी व इनोव्हेशन प्रकल्पाचे उद्घाटन
बारामती – राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशनच्या वतीने बारामतीच्या अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे नाविन्यपूर्ण प्रकल्प राज्यातील पाच इतर सेंटरसाठी पथदर्शी ठरतील, अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केली.
टेक्नॉलॉजी व इनोव्हेशन प्रकल्पाचे उद्घाटन रविवारी (दि.29) ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, डॉ. अनिल काकोडकर, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, नरेंद्र शहा, नरेंद्र देशमुख, उमेश रस्तोगी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, संस्थेचे सीईओ नीलेश नलावडे, संस्थेचे विश्वस्त विष्णूपंत हिंगणे, राजीव देशपांडे, डॉ. अविनाश बारवकर, डॉ. रजनी इंदुलकर उपस्थित होते.
डॉ. काकोडकर म्हणाले की, राज्यातील प्रत्येक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या सेंटरमधील प्रत्येक गोष्ट अनुभवता आली पाहिजे. ज्या देशात तंत्रज्ञानाची प्रगती होते, तोच देश प्रगत आहे, असे समजले जाते, त्यामुळे कृती करुन संशोधनाला पूरक वातावरण तयार करण्याची गरज आहे.
शरद पवार म्हणाले, 55 वर्षांपूर्वी विद्या प्रतिष्ठान व कृषी विकास प्रतिष्ठान या दोन संस्थाचे रोपटे लावले, स्व. अप्पासाहेब पवार यांनी प्रचंड कष्ट केले, वाहून घेणारी अनेक माणसे मिळाली, आज याच संस्थेतून असंख्य पेटंट प्राप्त करणारी मुले पाहिल्यानंतर समाधान मिळते. कृत्रीम बुध्दीमत्तेला दुर्लक्ष चालणार नाही. नवीन तंत्रज्ञानासाठी राज्य व केंद्र सरकार निधी देत आहे याचा आनंद आहे.
राजेंद्र पवार म्हणाले, प्रकल्पाअंतर्गत व्हर्च्यूअल रिॲलिटी, रोबोटिक्स लॅब, सायन्स ऑन स्पिअर, होलोग्राम टेक्नॉलॉजी वापर असे नावीन्यपूर्ण विविध डेमोस्ट्रेशन प्रकल्प उभारले आहेत. ते विद्यार्थी यांना पाहता येणार आहेत. प्रायोगिक तत्वावर सर्वप्रथम हे तंत्रज्ञान राज्यात आणले आहे. त्यामुळे हा प्रकल्प राज्यातील इतर पाच सायन्स सेंटरना पथदर्शी ठरतील. यावेळी डॉ. अनिल काकोडकर व अजित पवार यांनी सायन्स सेंटरमधील अनेक उपकरणांचा प्रत्यक्ष वापर करुन अनुभव घेतला. त्यांचे कामकाज कसे चालते याची त्यांनी बारकाईने माहिती घेतली.
एक हजार शिक्षकांना प्रशिक्षण देणार
अजित पवार म्हणाले की, राज्यातील एक हजार शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानाला आत्मसात करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे सेंटर राज्य व देशासाठी एक पथदर्शी असेल यात शंका नाही. नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी, मेडीसिटी व स्पोर्टस सिटी उभारण्याचा सरकारचा मानस आहे. परदेशी विद्यापीठांना जागा उपलब्ध करुन देत आहोत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तांत्रिक शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.





