पुणे जिल्हा : कोल्हेंनी घोडगंगावर खरे बोलावे; भाजप युवा मोर्चाचे भागवत यांचा सवाल

दौंड : खासदार अमोल कोल्हे यांनी भीमा पाट्स बरोबर घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर देखील खरे बोलावे, असा खडा सवाल दौंड तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष बापू भागवत यांनी केला. भागवत म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार)चे विद्यमान खासदार कोल्हे यांची नुकतीच रमेश थोरात यांच्या प्रचारासाठी सभा पार पडली. सभेत कोल्हे हे भीमा पाटस कारखान्यावर बोलले. निष्ठा काय असावी, यावर बोलले.
परंतु हे बोलत असताना ते विसरले की, ते शिरूर हवेली मतदारसंघात ज्या अशोक पवारांचा प्रचार करीत आहेत. त्यांनी सहकारी साखर कारखान्याची काय अवस्था केली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे मिळाले नाहीत. सहकारी कारखाना मोडीत काढण्यासाठी खासगी कारखाना देखील अशोक पवारांनी काढला आहे. तो जोमाने सुरू आहे. कोल्हेंनी थोडं त्याविषयी बोलायला पाहिजे होते. पण त्याचा त्यांना विसर पडला असावा.
रमेश थोरातांचा प्रचार करीत असताना ते निष्ठेविषयी बोलले. पण ज्यांनी जिल्हा बँक निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फसवले. ऐनवेळी अजित पवारांचा हात धरला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून निवडून आले, पुन्हा स्वार्थासाठी अजित पवारांकडे गेले. २०२४ लोकसभेला अजित पवार यांचे काम केले. पुन्हा स्वतःच्या स्वार्थासाठी शरद पवार यांचा हात धरला, अशा धोकेबाज माणसाच्या निष्ठेविषयी कोल्हे यांनी बोलावे, हे हास्यास्पद आहे.
ज्या अजित पवारांच्या सहकार्याने राजकारणात टिकून राहिले, ते त्यांचे झाले नाहीत. ते मतदारांचे काय होणार. यात कोल्हेंची चूक नाही त्यांना माहीत नाही की, कोल्हे ज्या पक्षाचे काम करतात, त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी (स्व) सुभाष कुल व आमदार राहुल कुल यांचे कारखान्याबाबत अनेकदा कौतुक केले आहे. भागवत म्हणाले की, भीमा पाटस चालू झाला, हेच विरोधकांचे मूळ दुखणे आहे. परंतु इथला शेतकरी मात्र समाधानी आहे त्यामुळे दौंड तालुक्यातील मतदार खासदार अमोल कोल्हे यांना किती गांभीर्याने घेतील असं वाटत नाही, असा टोला त्यांनी लगावला.





