पुणे– शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील १२५ चौकांत अॅडप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (एटीएमएस) ही सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली. मात्र, तिची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने दुसऱ्या टप्प्यात आणखी १०० चौकांत हे सिग्नल बसविण्यास महापालिकेने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. याबाबत महापालिका आयुक्तांकडे प्रस्ताव ठेवण्यात आला असून तूर्तास आणखी सिग्नल बसविण्याची गरज नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, आयुक्तांकडून त्यावर निर्णय न घेता हा प्रस्ताव स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीसमोर ठेवण्याच्या सूचना केल्या. या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १२५ सिग्नलसाठी १०२ कोटींचा खर्च झालेला आहे. तर दुसऱ्या टप्प्यासाठी ९६ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरात ही सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली असली, तरी शहरातील वाहतुकीचा अभ्यास करून त्यानुसार त्यात स्वयंचलित बदल केले जात नसल्याने वाहतूक कोंडी कायम आहे. याबाबत महापालिका आणि पोलिसांंनी अभ्यास केला. तसेच, ही यंत्रणा कोणी चालवायची याबाबत अद्यापही महापालिका, पोलीस आणि स्मार्ट सिटीत एकवाक्यता नाही. अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा असूनही त्याचा वापर होत नाही. त्यामुळे पोलिसांनीही या प्रणाली व त्याच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने संबंधित कंपनीकडे याबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे आधीची यंत्रणा उपयोगात येत नसताना आणखी ९६ कोटींचा खर्च कशासाठी करायचा? अशी भूमिका महापालिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे या दुसऱ्या टप्प्यास पालिकेचाच विरोध आहे.