pune : अजित पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषणने सन्मानित करावे
Pune :

आमदार विक्रम काकडे यांची गृहमंत्री शहांकडे मागणी
Pune: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे महाराष्ट्राच्या विकासातील गेल्या चार दशकांतील योगदान पाहता त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार विक्रम काकडे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आमदार काकडे यांनी शहा यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
महाराष्ट्राच्या विकासात गेली चार दशके अजित पवार यांनी अतुलनीय योगदान दिले आहे. आमदार, खासदार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याबरोबरच अजित पवार यांनी अर्थ आणि नियोजन, जलसंधारण, ऊर्जा, ग्रामीण विकास, कृषी आदी अनेक महत्त्वपूर्ण विभागात अमूल्य योगदान दिले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही अनेक लोककल्याणकारी उपक्रम आणि प्रकल्प राबवले गेले आहेत. त्यांची दूरदृष्टी आणि त्वरित निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे त्यांना जनतेचे प्रचंड प्रेम मिळाले.
त्यांचे योगदान येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार असून, केंद्र सरकारने या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी विनंतीही निवेदनाद्वारे काकडे यांनी केली आहे.





