Priyanka Chopra: जागतिक स्तरावर ओळख निर्माण केलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra)सध्या तिच्या आगामी ‘वाराणसी’ या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. दरम्यान, एका अलीकडील मुलाखतीत तिने बॉलिवूडपासून दूर जाण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. करिअरच्या शिखरावर असतानाही बॉलिवूडमध्ये काही नाती तणावपूर्ण झाल्यामुळे तिला मर्यादित वाटू लागले होते, असे तिने सांगितले. प्रियंका चोप्राने २०१५ साली ‘क्वांटिको’ या मालिकेद्वारे हॉलीवूडमध्ये प्रवेश केला. त्यानंतर जवळपास दशकभरात तिने जागतिक मनोरंजन क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अलीकडेच तिने अमांडा हिर्श यांच्या ‘नॉट स्किनी बट नॉट फॅट’ या पॉडकास्टमध्ये सहभाग घेतला होता. या संवादात तिने आपल्या करिअरमधील महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल आणि बॉलिवूड सोडण्यामागील कारणांबद्दल खुलेपणाने चर्चा केली. Priyanka Chopra प्रियंका म्हणाली की, जेव्हा ती भारतात काम करत होती, तेव्हा तिला स्वतःला मर्यादित वाटू लागले होते. तिला जगात अजून कोणत्या संधी उपलब्ध आहेत, हे पाहायचे होते. त्या काळात हॉलीवूडमध्ये भारतीय कलाकारांचे प्रतिनिधित्व खूप कमी होते. अभिनेत्री मिंडी कलिंग आणि ऐश्वर्या राय यांच्याशिवाय फारसे भारतीय कलाकार तिथे दिसत नव्हते. त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय कलाकारांना अधिक संधी मिळायला हव्यात, अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. Priyanka Chopra तिने सांगितले की, त्या काळात तिला अमेरिकेत शिक्षण घेत असताना अनुभवलेली भावना पुन्हा जाणवली. जणू वर्गात स्वतःसारखा कोणीच दिसत नाही, अशी भावना तिच्या मनात होती. त्यामुळेच तिने हॉलीवूडमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.Priyanka Chopra या मुलाखतीत प्रियंका चोप्राने बॉलिवूडमधील वातावरणाबद्दल बोलताना एक महत्त्वाची टिप्पणीही केली. ती म्हणाली, “मला घाणीत राहायला आवडत नाही. कारण एखादी व्यक्ती सतत त्या वातावरणात राहिली तर तिला त्या वासाची सवय होते.” तिच्या मते, आयुष्यात अडचणी आल्या तरी बदल स्वीकारणे खूप महत्त्वाचे असते. प्रियंका म्हणाली की, आयुष्यात प्रत्येकाला काही संघर्षांना सामोरे जावे लागते. पण त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी धैर्य आणि बदलाची तयारी असणे आवश्यक आहे. तिने स्वतःच्या आयुष्यात अनेक वेळा असे निर्णय घेतले असल्याचेही सांगितले. हॉलीवूडमध्ये करिअर सुरू करताना तिच्यासमोर कोणताही ठरलेला मार्ग नव्हता. तरीही आपल्या मेहनतीवर आणि आत्मविश्वासावर तिने विश्वास ठेवला. प्रियंका म्हणाली की, ती मेहनती आहे आणि तिला तिचे काम चांगले माहित आहे. कोणत्याही दिग्दर्शक किंवा सहकलाकारासोबत काम करताना ती पूर्ण आत्मविश्वासाने उभी राहू शकते. सध्या प्रियंका चोप्रा तिच्या ‘वाराणसी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार असून त्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.