औद्योगिक हाहाकाराबाबत मुख्यमंत्री शांतच- पृथ्वीराज चव्हाण
पुणे: औद्योगिक मंदीमुळे महाराष्ट्रात हाहाकार उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांवर टिका करण्यात धन्यता मानतात. 2014 नंतर राज्यात किती हजार कोटींची गुंतवणूक झाली. त्यामुळे किती नवीन रोजगार निर्माण झाला याची आकडेवारी देण्याऐवजी सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी मोठ्या पदावरील मंत्री देखील बेजबाबदारपणाचे वक्तव्य करीत असल्याची टिका, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पिंपरी येथे केली
रविवारी पिंपरी येथे पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष सचिन साठे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे, महाराष्ट्र प्रदेश अनूसूचित जाती कॉंग्रेस कमिटी कार्याध्यक्ष गौतम आरकडे, माजी महापौर कविचंद भाट, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, युवक कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस मयूर जैसवाल, शिवराज मोरे, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा शामला सोनवणे तसेच सुंदर कांबळे, विशाल कसबे, मकरध्वज यादव, अनिरूद्ध कांबळे, शीतल कोतवाल आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण या वेळी म्हणाले की, पुण्यासारख्या इंडस्ट्रीयल मॅग्नेट व डेट्रॉइट ऑफ ईस्ट म्हणून ओळखल्या जाणा-या भागात चार वर्षात अवघे 20 हजार रोजगारनिर्माण झाल्याची माहिती सरकार देते. फॉक्सकॉन कंपनी 35 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून आयफोनचे उत्पादन करणार आणि जनरल मोटर्सचा गुजरातमधील प्रकल्प बंद करून पुण्याजवळ 6400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार अशी जाहिरात करीत इव्हेंट करणारे फडणवीस आता राज्यातील औद्योगिक गुंतवणूकीची व रोजगारांची आकडेवारी का देऊ शकत नाही? असा प्रश्न चव्हाण यांनी या वेळी उपस्थित केला.





