शरद पवारांची अमित शहांवर टीका
सोलापुर : सोलापुरात आलेल्या शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले. बरे वाईट केल्यामुळे शरद पवार कधी तुरुंगात गेला नव्हता. त्यामुळे तुरुंगात गेलेल्यांनी शरद पवारांनी काय केले हे सांगू नये, असा टोला त्यांनी अमित शहा यांना लगावला. सोलापूर येथे आलेल्या महाजनादेश यात्रेवेळी अमित शहांनी शरद पवारांनी काय केले, असा सवाल केला होता.
मी काय केले आहे हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. मी लोकांचे काहीही वाईट केलेले नाही. त्यामुळे तुरुंगात गेलो नाही, असे सांगत शरद पवार यांनी अमित शहा यांना टोला लगावला. शरद पवारांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांवरही निशाणा साधला. पक्षातून गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता. गेलेले नेते इतिहास जमा होणार आहेत. गेलेल्यांची चर्चा बंद करा, आता येणाऱ्यांची चर्चा करा, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. त्यांनी किल्लारी भूकंपाचा प्रसंग सांगत आपत्ती व्यवस्थापनावेळी राज्याच्या प्रमुखाने कशा पद्धतीने वागले पाहिजे याची जाणीव करुन दिली. ते म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना किल्लारीचा भूकंप झाला होता. त्यावेळी मी सकाळी सात वाजता किल्लारीत होतो. आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने करतात आणि अर्ध्या तासात गायब होतात. राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्कामी करुन राहावे लागते. कारण त्याशिवाय यंत्रणा हालत नाही.