प्रभात इफेक्ट : ‘प्रभात’च्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे; जांबूतच्या धोकादायक पुलावर दुरुस्ती
शिरूर — आंबेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या गायमुख फाटा — अवसरी — शिक्रापूर या मार्गाचे कॉंक्रीटकरणाच्या कामावर जांबूत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जांबूत : शिरूर — आंबेगाव तालुक्यांना जोडणाऱ्या गायमुख फाटा — अवसरी — शिक्रापूर या मार्गाचे कॉंक्रीटकरणाच्या कामावर जांबूत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. जांबूत (ता.शिरूर) गावठाण परिसरात जय मल्हार हायस्कूलनजिक सुरु असलेले पुलाचे काम अनेक दिवसांपासून बंद होते.
मात्र खोदकाम करून ठेवलेल्या यां पुलाचा अंदाज येत नसल्याने नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना अपघातांना सामोरे जावे लागत होते मात्र अशातच मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे सदर पूल वाहून गेल्याने संबंधित ठिकाणी मोठा खड्डा पडून अपघात झाल्याची घटना घडली.
यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी सदर रस्त्याचे ठेकेदार आणि रस्ते प्रशासन यांना अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद न आल्याने त्यांनी साथ गतीने सुरु असलेल्या कामावर नाराजी व्यक्त केली.
याबाबत जांबूत विकास सोसायटीचे अध्यक्ष आनंद जगताप यांनी तक्रार केल्यानंतर दैनिक प्रभात ने याबाबत मागोवा घेत संबंधित घटनेबाबत वृत्त प्रसिद्ध करताच तत्काळ दुसऱ्या दिवशीच संबंधित पुलावर तात्पुरती उपाययोजना करत सदर ठिकाणी सिमेंट पाईप टाकून मुरूम भरावा केल्याने वाहतुकीचा मार्ग सुरळीत झाला. याबद्दल जांबूत ग्रामस्थांकडून दैनिक प्रभातचे आभार व्यक्त करण्यात आले.
गायमुख (मंचर)- शिक्रापूर हा मार्ग अत्यंत महत्वपूर्ण मानला जात असून या मार्गावर अनेक ठिकाणी पुलांची कामे अर्धवट स्वरुपात झालेली असून यामुळे संभाव्य अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत तक्रार करण्याचे ठरल्यास संबंधित ठेकेदार यांचा संपर्क होत नाही तसेच सदरचे काम करून घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी देखील फोन स्वीकारत नसल्याने नागरिकांना चुकीच्या आणि निकृष्ट कामाबद्दल कल्पना देत येत नाही.
याबाबत रस्ते प्रशासन आणि ठेकेदार यांनी सुरु असलेल्या पुलांची कामे तातडीने मार्गी लावून घेणे गरजेचे असून अनेक ठिकाणी सुरु असलेल्या साइड पट्ट्यांची कामे देखील लवकरात लवकर योग्य प्रकारे मार्गी लावावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.





