सुरक्षा साधनांचा अभाव वेतनही न मिळाल्याने जगण्याचा प्रश्न
पिंपरी – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असलेल्या बसवर काम करणाऱ्या वाहक आणि चालकांची सुरक्षा रामभरोसे असून त्यांना कोणतीही सुरक्षा साधणे पुरविण्यात न आल्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यातच दैनंदिन वेतनावर कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अद्याप वेतन न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
“पीएमपी’च्या वतीने अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी काही मार्गावर बस चालविल्या जात आहेत. त्यात गेल्या काही दिवसांपासून शहरात राहणाऱ्या मात्र परराज्यात जात असलेल्या कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पीएमपीच्या बसमधून सोडले जात आहे. यासाठी पीएमपीच्या काही बसेस कार्यरत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या पीएमपीच्या चालक व वाहकांना सुरुवातीला मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझर देण्यात आले. मात्र एका आठवड्यातच ही सुरक्षा साधने खराब झाली. यानंतर गेल्या 50 दिवसांपासून हे कर्मचारी सुरक्षा साधनांविनाच कार्यरत आहेत.
पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली असताना तसेच अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या अनेकांना करोनाची लागण झाल्यानंतरही या पीएमपी कर्मचाऱ्यांना कसल्याच सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांना वेठबिगारी म्हणून वागविणाऱ्या पीएमपी प्रशासनाची महामारीमध्येही अशीच भूमिका असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे. त्यातच कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना अद्यापही वेतन देण्यात आलेले नाही. विशेष बाब म्हणजे यातील अनेक कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत. त्यांनाही वेतन न दिल्यामुळे या कर्मचाऱ्यांना घर चालविणे मुश्किल बनले आहे.
त्यातच आता परप्रांतियांना सोडण्यासाठी पीएमपी बस धावू लागल्यामुळे हजारो कामगारांची वाहतूक करतानाही सुरक्षा साधणे दिली जात नसल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या जिवावरच प्रशासन उठले आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. करोना योद्धे, लढवय्ये म्हणून केवळ गप्पा मारणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांनीही पीएमपी कर्मचाऱ्यांबाबत एक “ब्र’ शब्दही न उच्चारल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.