PMC Water Wastage: महापालिकेचा अजब कारभार! स्वच्छतागृहांसाठी थेट पिण्याचं पाणी; सव्वा टीएमसी पाण्याची नासाडी
PMC Water Wastage: शहरातील १,०८१ स्वच्छतागृहांमधील ९० टक्के नळजोड थेट पिण्याच्या पाण्याचे; केअरटेकर नसलेल्या ठिकाणी गळतीमुळे लाखो लिटर पाणी गटारात.

PMC Water Wastage : शहरातील पालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी पिण्याचे पाणी वापरले जा असून त्यामुळे वर्षाला तब्बल सव्वा टीएमसी पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे. सध्या पाण्याची टंचाई तीव्रपणे जाणवत असताना स्वच्छतागृहांसाठी पिण्याचे पाणी वापरले जाणे ही धक्कादायक बाब आहे. विशेष म्हणजे, अनेक स्वच्छतागृहांमधील पाण्याच्या टाक्यांना गळती असून नळकोंड्यांची चोरी आणि तोडफोड होत असल्याने दिवसभर पाणी वाया जाते.
पिण्याचे पाणी वापरण्याऐवजी महापालिकेने स्वच्छतागृहांसाठी बोअरवेल, जुन्या विहिरी तसेच इतर पर्यायी जलस्त्रोतांचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते. पालिकेने २०१४-१५ मध्ये शहरातील काही भागांमध्ये स्वच्छतागृहांचे क्लस्टर तयार करून त्यांच्यासाठी बोअरवेलद्वारे पाणीपुरवठा केला होता. त्याच धर्तीवर भविष्यातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी स्वच्छतागृहांसाठी पिण्याच्या पाण्याऐवजी इतर पर्यायांचा विचार करण्याची गरज होती.
२०१५ मध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत अवघा १५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. त्यावेळी पालिकेने स्वारगेट आणि पर्वती परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचे क्लस्टर तयार करून तेथे बोअरवेल उभारण्यात आल्या होत्या. त्याद्वारे स्वच्छतागृहांसाठी पाणी उपलब्ध करून दिले होते.यानंतर शहरातील इतर जलउच्छवासांचा वापर करूनही काही स्वच्छतागृहांना पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, पुढे हा प्रस्ताव रखडला. त्यामुळे बोअरवेलद्वारे स्वच्छतागृहांना पाणीपुरवठ्याचा प्रयोग यशस्वी ठरूनही त्याचा विस्तार झाला नाही.
वाया जाते तीन लाख नागरिकांच्या पाणी
शहरात महापालिकेची सुमारे १,०८१ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. त्यामध्ये ६६८ कम्युनिटी टॉयलेट आणि ४१२ सार्वजनिक स्वच्छतागृहांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी मिळून १३ हजार ६६४ सीट्स आहेत. यापैकी सुमारे ९० टक्के स्वच्छतागृहांना पिण्याच्या पाण्याच्या नळजोड दिलेले आहेत. ज्या स्वच्छतागृहांत केअरटेकर उपलब्ध आहेत, तेथे संपवेलद्वारे पाणीपुरवठा केला जातो. केअरटेकर नसलेल्या ठिकाणी थेट स्वच्छतागृहांच्या टाक्यांमध्ये पाणी सोडले जाते.
संबंधित भागात ज्या कालावधीत पाणीपुरवठा सुरू असतो, त्या काळात गळके नळ आणि तुटलेल्या यंत्रणांमुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. या ठिकाणच्या नळजोडणी व यंत्रणेची नियमित तपासणी होणे अपेक्षित असतानाही संबंधित क्षेत्रीय कार्यालयांकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. परिणामी, दररोज लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा कमी पडत असताना, स्वच्छतागृहांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापर कमी केल्यास तब्बल तीन लाख नागरिकांच्या वाट्याचे पाणी वाचू शकते.
“स्वच्छतागृहांमध्ये पूर्वीपासूनच पाण्याचे नळजोड आहेत. त्यासाठी पिण्याचे पाणी न वापरता इतर पर्यायांचा विचार करणे शक्य आहे. यासाठी सर्वेक्षण करून सार्वजनिक जलस्त्रोतांची माहिती घेतली जाईल आणि उपाययोजनांबाबत पाणीपुरवठा विभागाशी चर्चा करण्यात येईल.”
– संतोष वारुळे (उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन)





