PMC News – महापालिका मुख्य सभेत नगरसेवकांनी प्रशासनावर शहरातील पाणीपुरवठ्याबाबतच्या प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर लवकरच पाणीप्रश्न सोडवून तो सुरळीत होण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे उत्तर महापालिका प्रशासनाकडून देण्यात आले. जवळपास सर्वच नगरसेवकांनी आपापल्या भागातील पाण्याचे प्रश्न सभागृहात मांडले. यामध्ये समाविष्ट गावातील नगरसेवकांचे प्रश्न सर्वाधिक होते. पेठांमधील काही भागांत पाणी पुरेशा दाबाने येत नाही. दूषित पाणीपुरवठा, रखडलेला समान पाणी पुरवठा प्रकल्प, पाणी सोडणारे वाॅलमन कंत्राटदारांचे असतात, ज्या सोसायट्या अतिरिक्त पैसे देतील, त्यांनाच ते पूर्ण क्षमतेने पाणी सोडतात, अशा आरोपांसह अनेक तक्रारी नगरसेवकांनी केल्या. यामध्ये रुपाली धाडवे, नितीन जागडे, व्यंकोजी खोपडे, श्वेता घुले, अजय खेडेकर, किरण दगडे, प्रसन्न जगताप, योगेश मुळीक आणि अन्य सदस्यांचा समावेश होता. पुण्याला पुरेल इतके पाणी धरणात आहे; परंतु केवळ त्याच्या वाटपाचे नियोजन नीट नसल्याने ही टंचाई निर्माण होते, असे जगताप म्हणाले. अप्पर सुपर इंदिरानगरच्या बहुतांश भागातही पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी केली. त्यावर प्रशासनाने हा प्रश्न लवकरच सोडविण्याचे आश्वासन दिले. “प्रभागनिहाय बैठका घेत आहोत. या प्रश्नावर एकत्रित तोडगा काढू. समान पाणीपुरवठा योजनेतील कामे लवकरात लवकर पूर्ण करू. काही टाक्या बांधून पूर्ण आहेत; पण कनेक्शन नाही. अर्धवट झालेल्या टाक्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश ठेकेदाराला दिले आहेत. गरजेनुसार टँकरची संख्या वाढवू.” – नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागप्रमुख