Mallikarjun Kharge : “पंतप्रधान मोदींचे परराष्ट्र धोरण देशाचे शत्रू वाढवणारे”; खर्गेंचे जोरदार टीकास्त्र

Mallikarjun Kharge – कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विविध मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर टीकास्त्र सोडले. मोदींचे परराष्ट्र धोरण अयोग्य आहे. त्यामुळे देशाचे शत्रू वाढत आहेत, असा दावा त्यांनी केला.
चुकीच्या परराष्ट्र धोरणामुळे अनेक देश भारतापासून अंतर राखू लागले आहेत. जगाच्या काना-कोपऱ्यात भारताचे शत्रू निर्माण होत आहेत. एकीकडे चीन, तर दुसरीकडे पाकिस्तान आहे. आता नेपाळही आपल्यापासून दूर जाऊ लागला आहे, असे खर्गे हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
मोदींनी अनेक देशांचे दौरे केले. मात्र, हिंसाचारग्रस्त मणिपूरला त्यांनी अजूनही भेट दिलेली नाही. देशातील जनतेकडे, शेतकऱ्यांकडे ते लक्ष देत नाहीत. मोदींनी ११ वर्षांच्या राजवटीत देशाची अर्थव्यवस्था उद्धवस्त केली.
तसेच, राज्यघटनेला कमजोर बनवले, अशा आरोपांची सरबत्तीही त्यांनी केली. कॉंग्रेसने मागील काही काळापासून अर्थव्यवस्था, राज्यघटना, परराष्ट्र धोरण आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारला आक्रमकपणे घेरण्याची रणनीती अवलंबली आहे. ते सत्र खर्गे यांनी कायम ठेवले.





