प्रभात वृत्तसेवा चिखली ( संतोष चव्हाण ) – गेली अनेक वर्ष पुणे नाशिक महामार्गावरील मोशी या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचा बस थांबा आहे. परंतु इतक्या वर्षांत महामंडळाला येथे प्रवाशांसाठी एक शेड उभारता आले नाही. पर्यायाने ऊन, पावसात, चिखलात प्रवाशांना एसटीची वाट पाहत थांबावे लागत आहे. यात विशेषत: वयोवृद्ध, लहान मुले, महिला मोठ्या प्रमाणात थांब्यावर उभ्या असलेल्या पहायला मिळतात. मोशी येथील या थांब्यावरुन चाकण, राजगुरुनगर, खेड, जुन्नर, मंचर, आळेफाटा, नारायणगाव, नाशिक,औरंगाबाद या ठिकाणी प्रवास करणारे अनेक प्रवासी या थांब्यावर एसटीची वाट पाहत उभे राहतात. क्वचितच वेळेवर येणाऱ्या एसटीमुळे प्रवाशांना येथे बराच वेळ वाट पाहत थांबावे लागते. प्रवाशांना बसण्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही. एवढेच नव्हेत तर ऊन-पावसापासून बचाव करण्यासाठी एखादे शेड देखील उभारण्यात आले नाही. येथून मोठ्या प्रमाणात एसटीला उत्पन्न मिळत असताना देखील येथील प्रवाशांकडे महामंडळांने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मोठ्या प्रमाणात होते गर्दी.. वाढत्या नागरीकरणामुळे या परिसरातील लोकसंख्या वाढली आहे. येथून वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील खूप अधिक आहे. येथूनच अनेक भाविक श्रीक्षेत्र देहू आणि श्रीक्षेत्र आळंदीकडे जात असतात. यामुळे प्रवाशांची संख्या अधिक आहे. पुणे-नाशिक महामार्गावर हा थांबा असल्याने वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा वर्दळीत आपल्या प्रवांशांना निवारा देण्याची तसदी महामंडळ कधी घेणार? असा प्रश्न उपस्िथत होत आहे. महामंडळाने किमान मुलभूत सुविधा दिल्या तरी प्रवासी संख्या वाढू शकते. महामंडळाने सुविधा दिल्यास चाकण, राजगुरुनगर, खेड, जुन्नर अशा ठिकाणी जाणारे प्रवासी पीएमपी अथवा खासगी वाहनांचा पर्याय निवडणार नाहीत. पावसाळ्यात वाढतात हाल.. सध्या पावसाळा सुरु असल्याने येथे पाणी साचले आहे. चिखल झाला असून पडत्या पावसात एसटीची प्रतीक्षा करणे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे. यामुळे येथे महामंडळाने शेड उभारुन द्यावे, अशी मागणी होत आहे. प्रवासी नको आहेत का? तोट्यात चाललेल्या एसटीला प्रवासी नको आहेत का? असा प्रश्न येथील परिस्िथती पाहिल्यावर उपस्िथत होतो. अनेकदा लांब पल्ल्याच्या एसटी येथे थांबविल्याच जात नाहीत. बराच वेळ वाट पाहत थांबलेल्या प्रवाशांना डावलून एसटी निघून जाते. काही चालक एसटी थांबवितात परंतु पुढे किंवा मागे थांबवितात. प्रवाशांना आपले सामान घेऊन धावपळ करावी लागते.