Pimpri News | शहरात डासांचे साम्राज्य,नागरिक त्रस्त… महापालिका मात्र सुस्त ; डासांपासून बचावाची नाही योजना

प्रभात वृत्तसेवा
रावेत – पावसाळा संपत आला असतानाच पिंपरी-चिंचवड शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विशेषतः चिंचवड, काळेवाडी, वाल्हेकरवाडी, चिखली, मोशी आणि तळवडे परिसरात डेंगी व चिकनगुनियाचा धोका वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
शहराच्या विविध भागांमध्ये डेंगी व चिकनगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने फक्त औपचारिक तपासण्या सुरू केल्या आहेत. मात्र फॉगिंग, गप्पी मासे सोडणे, जनजागृती मोहिमा यांसारख्या प्रत्यक्ष उपाययोजनांमध्ये महापालिका अपयशी ठरल्याची टीका होत आहे. दरवर्षी पावसाळा सुरू होताच पाणी साचलेल्या ठिकाणी गप्पी मासे सोडले जातात, पण यंदा अनेक ठिकाणी फक्त फोटोसाठीच मोहीम दाखवतात.
प्रत्यक्ष उपाययोजना नाहीत, असा नागरिकांचा आरोप आहे.शहरात बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला आणि तापाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे खासगी दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक आहे. तर तरुणांना देखील औषधे घेऊन अनेक दिवस खोकला जात नसल्याने ते देखील हैराण झाले आहेत.
आरोग्य यंत्रणा निष्क्रिय, नागरिक त्रस्त..
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे डासांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी असली, तरी फॉगिंग यंत्रणा नीट सुरू नाही, नाल्यांची स्वच्छता वेळेवर होत नाही, आणि पाणी साचलेले जागोजागी आढळते. गेल्या दोन महिन्यांत डेंगीसदृश रुग्ण आढळल्याने शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागरिकांचे आरोग्य धोक्यात..
पावसामुळे जागोजागी पाणी साचल्याने डासांच्या उत्पत्तीला खतपाणी मिळत आहे. त्यामुळे डेंगी, मलेरिया आणि चिकनगुनियाचा धोका वाढला आहे. शहरातील मोशी, तळवडे, चिंचवड, सांगवी, भोसरी आणि रहाटणी परिसरातही डासांचा त्रास दिवसेंदिवस वाढतोय.
“रोज संध्याकाळी घराचे दरवाजे, खिडक्या बंद कराव्या लागत आहे. एखाद्या दिवशी दरवाजे बंद करायला विसरलो की रात्र मच्छर मारण्यात घालवावी लागते.”
– राजेश्री कदम, रहिवासी, चिंचवड
डॉक्टरांचा सल्ला – खबरदारी घ्या!
-घर व परिसरात पाणी साचू देऊ नये
-आठवड्यातून एकदा ‘कोरडा दिवस’ पाळावा
-कूलर, टाक्यामध्ये साचलेले पाणी नियमित बदलावे
-झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा
-लक्षणे दिसल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा
महापालिकेकडे नागरिकांची मागणी..
-तातडीने फॉगिंग मोहीम राबवावी
-गप्पी मासे सोडण्याची मोहीम राबवावी
-पाणी साठ्यांची तपासणी सुरू करावी
-शहरात जनजागृती मोहिमा सुरू कराव्यात





