PCMC News – प्रशासकीय राजवटीमध्ये झालेल्या चुकीच्या कामांवरून लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांमधील संघर्ष टोकाला पोहचला आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकीय सभेत देखील नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकारी करत असलेल्या भ्रष्टाचारामुळे महापालिकेला गळती लागली असून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालिका धुऊन खाल्याची टीका करत तत्कालीन आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. ते अधिकारी बदली होऊन गेले असले तरी त्यांची सिंह टोळी अद्याप महापालिकेत कार्यरत असल्याचे सांगत नगरसेवकांनी सभेत प्रशासनाचे अशरक्षः वाभाडे काढले. नगरसेवकांचा कार्यकाळ सुरू झाल्यापासून प्रशासन विरुद्ध नगरसेवक असे वेगळेच चित्र महापालिकेत दिसून येत आहे. नगरसेवक विश्वजीत बारणे यांनी प्रकल्पांवर अनावश्यक खर्च होत असल्याचा आरोप करत, फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. पाण्याची तीव्र टंचाई आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी केली. नगरसेवक नितीन काळजे यांनी अंदाजपत्रक सादर करण्याच्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आम्हाला अंदाजपत्रकाचे पुस्तकच दिले नाही, ही कोणती पद्धत? असा सवाल करत त्यांनी संताप व्यक्त केला. छोट्या कामांसाठी निधी नाही, मात्र कोट्यवधींचे प्रकल्प राबवले जातात. नागरिकांना पाणी, रस्ते, गटार देता येत नसतील तर मोठे प्रकल्प बंद करा. पीसीएमसी सभा तसेच, तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांच्यावरही त्यांनी थेट आरोप करत, महापालिकेचे वाटोळे त्यांच्या काळात झाले, अशी टीका केली. बीआरटी प्रकल्प बंद करण्याची मागणी करत सल्लागारांवर होणाऱ्या खर्चावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. नगरसेविका रिटा सानप यांनी शिक्षण विभागातील त्रुटींवर बोट ठेवत शिक्षक व मुख्याध्यापकांच्या नियमित बदल्यांची मागणी केली. नगरसेविका सुलभा उबाळे यांनी देखील शिक्षण विभागातील कारभारावर टीका करत गंभीर आरोप केले. नगरसेवक योगेश बहल म्हणाले, नवीन आयुक्त आले आहेत, त्यांचे स्वागत मात्र या प्रशासनाचा धिक्कार आहे. आज महापालिकेची अवस्थाय दयनीय आहे. अंदाजपत्रकामध्ये बुजगावण उभं केलं आहे. फक्त आकडे फुगवले आहेत. मोठी रुग्णालये बांधणे आपली जबाबदारी नाही, ती चालविण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही याचा विचार केला पाहिजे. प्रशासकीय राजवटीमध्ये हे अधिकारी मस्तवाल झाले आहेत. प्रत्येक कामामागे यांना ८ ते १० टक्के हवे आहेत. ती बघा सिंह टोळी आली सभागृहामध्ये अंदाजपत्रकावर चर्चा सुरू असताना अनेक अधिकारी अनुपस्थित होते. नगरसेवक शीतल शिंदे यांनी हा मुद्दा काढून अधिकाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या सभागृहामध्ये मागील आठ तासांपासून प्रत्येक नगरेसवक पोटतिडकीने बोलत आहे. शहरातील महत्वाच्या मुद्द्यांवर बोलत असताना अधिकारी मात्र जाग्यावर नाही. शिंदे यांनी असे म्हणताच सभागृहातील महापौर कक्षात निवांत बसलेले अधिकारी भानावर आले. त्यानंतर एकामागोमाग अधिकारी सभागृहात आले. त्यानंतर शिंदे यांनी ती बघा सिंह टोळी आली असे म्हणत जोरदार टीका केली.