PCMC Abhay Yojana : १५७ कोटींची वसुली, ५५ हजार जणांना फायदा; महापालिकेच्या अभय योजनेचा आज शेवटचा दिवस
PCMC Abhay Yojana : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अभय योजनेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; ३१ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत कर संकलन केंद्रे सुरू राहणार.

PCMC Abhay Yojana – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेचा आतापर्यंत ५५ हजार ७११ थकबाकीदारांनी लाभ घेतला आहे. ही योजना लागू झाल्यापासून म्हणजेच १ मार्चपासून तब्बल १५७ कोटी २१ लाख ५३ हजार रुपयांचा मालमत्ता कर वसूल झाला आहे.
अभय योजनेचा कालावधी हा ३१ मार्चला संपणार असून, ज्या थकबाकीदारांनी अद्याप मालमत्ता कर भरला नाही त्यांनी तो आज (दि. ३१ मार्च) अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. गेल्या २९ दिवसांमध्ये आतापर्यंत एकूण ६८ हजार ४८८ मालमत्ताधारकांनी १५७ कोटी २१ लाख ५३ हजार रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे.
यापैकी ५५ हजार ७३१ थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेतला असून, त्यांना एकूण ३८ कोटी ८१ लाख रुपयांची दंडावरील सवलत देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, महापालिकेच्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आता केवळ एकच दिवस शिल्लक राहिला असून, ३१ मार्च रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ही योजना लागू राहणार आहे.
त्यामुळे अद्यापही मालमत्ता कर थकबाकी असलेल्या नागरिकांनी या अंतिम संधीचा लाभ घेऊन आपली थकबाकी तत्काळ भरावी, असे आवाहन उपायुक्त सचिन पवार यांनी केले आहे. महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष मोहिम राबविण्यात येत असून, मालमत्तेच्या ठिकाणी समक्ष भेट देऊन कर भरण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
तसेच ऑनलाइन पेमेंट, धनादेशाद्वारे भरणा आणि कॅश काउंटर अशा विविध माध्यमांद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शेवटच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागीय कर संकलन कार्यालयांचे कॅश काउंटर ३१ मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत.
एक हजार कोटींचा टप्पा ओलांडणार का?
कर संकलन विभागाने सोमवारी (दि. ३०) सायंकाळी सहा वाजेपर्यंत ९२० कोटी ६३ लाख रुपयांचा महसूल जमा केला आहे. आता मार्च महिना संपण्यास मंगळवारचा एक दिवस शिल्लक आहे. या एका दिवसात सुमारे ८० कोटी रुपयांची वसुली करत विभाग एक हजार कोटींचा टप्पा ओलांडणार का याकडे लक्ष लागले आहे.
“अभय योजनेमुळे कर वसुलीत लक्षणीय वाढ झाली असून, थकबाकीदारांना दिलासा देण्याचा उद्देश साध्य होत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कर भरणे ही सकारात्मक बाब आहे नागरिकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, कोणत्याही अडचणीशिवाय नागरिकांनी कर भरावा.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका






