Patas Lake Survey: पाटस गावतलावाची आज मोजणी! कित्येक वर्षांच्या वादानंतर अतिक्रमणांवर अखेर हातोडा चालणार
Patas Lake Survey: पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या पाटस तलावाचे क्षेत्र आक्रसल्याने ग्रामस्थ आक्रमक; भूमी अभिलेख विभागाकडून जागा मालकांना नोटीस जारी.

Patas Lake Survey – पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाटस गाव तलावाच्या क्षेत्राची महसूल विभागाच्या पुढाकाराने सोमवार (दि.२०) शासकीय मोजणी होणार आहे. तलावातील अतिक्रमण आणि क्षेत्रफळाबाबतची तफावत दूर करण्यासाठी दौंड भूमी अभिलेख विभागाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. मागील कित्येक वर्षांपासून पाटस गाव तलावातील अतिक्रमण आणि तलावाचे नेमके क्षेत्रफळ किती, याबाबत वाद निर्माण झाला होता.
दिवसेंदिवस तलावाचे क्षेत्र कमी होत असल्याने पाणीसाठा घटला होता. तलावाभोवती अतिक्रमणांनी विळखा घातल्याने हा मुद्दा गंभीर बनला होता. त्यामुळे गावतलाव क्षेत्राची शासकीय मोजणी करून हद्द कायम करण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार अरुण शेलार यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन तहसीलदार शेलार यांनी दौंड भूमी अभिलेख कार्यालयाला त्वरित शासकीय स्तरावर मोजणी करण्याचे आदेश दिले होते.
त्याअनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने तलाव लगतच्या जागा मालकांना मोजणीची नोटीस बजावली आहे. मोजणीसाठी पाटस मंडल अधिकारी, राखीव वनक्षेत्र विभाग, प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विभाग, तलावालगतच्या संबंधित शेत जमीन मालकांना तलाठीमार्फत नोटीस दिल्या आहेत. भूकरमापकासोबत मोजणीच्या दिवशी दिवसभर हजर राहावे. मोजणी अंती संबंधित खातेदारांनी आणि विभागांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, अशा सूचनाही नोटीसमध्ये दिल्या आहेत.
मोजणीनंतर तलावाची नेमकी हद्द व क्षेत्र निश्चित होऊन अतिक्रमणांवर कारवाईचा मार्ग मोकळा होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, पाटस येथील गाव तलावाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी लक्ष घातले आहे. या प्रकरणात कोणतीही दिरंगाई न करता, तातडीने तलाव क्षेत्राची मोजणी करून तलाव क्षेत्राचे हद्द व क्षेत्र कायम करून सातबारा पत्रकी नोंद करून तलाव क्षेत्र अतिक्रमणमुक्त करावे अशा सूचना मंत्री बावनकुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
अष्टविनायक रस्त्यावरचा अडथळा दूर होणार
आमदार राहुल कुल यांनी लक्ष देऊन तलावाचे क्षेत्राची हद्द कायम व्हावी, तलाव अतिक्रमणमुक्त करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात. अतिक्रमण काढले गेल्यास पाटस ते कुसेगाव अष्टविनायक रस्त्यावरचा मोठा अडथळा निघणार आहे. परिणामी पाटस येथील राजमाता अहिल्याबाई होळकर चौकातील वाहतूक कोंडी, भीमा पाटस कारखान्याच्या ऊस वाहतुकीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.






