उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आरोप
नवी दिल्ली : देशात सीएए आणि एनआरसीविरोधात अजूनही मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. त्यातच देशात शाहिनबागचे आंदोलन चांगलेच चिघळत चालले आहे. दरम्यान, याच आंदोलनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे समर्थन करणारे आज शाहीन बागमध्ये आंदोलन करत आहेत. तिथे ते आझादीच्या घोषणा देत आहेत असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल सरकारवर शाहीनबागमधल्या आंदोलकांना बिर्यानी पुरवण्याचा आरोप केला.
योगी आदित्यनाथ भाजपाच्या प्रचारासाठी दिल्लीमध्ये आले आहेत. सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी विरोधात 15 डिसेंबरपासून महिला आणि मुलांसह शेकडो लोक शाहीनबागमध्ये आंदोलन करत आहेत. शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या एका युवकाला दिल्ली पोलिसांनी आज ताब्यात घेतले. त्याचवेळी योगी आदित्यनाथ यांनी हे विधान केले आहे. दिल्लीत वेगवेगळया ठिकाणी सुरु असलेली आंदोलनं सीएएसाठी नाहीत. भारताचा जगात प्रमुख देश म्हणून उदय कसा झाला? असा प्रश्न यांना पडला आहे. भारताची प्रगती रोखण्यासाठी हे सर्व चालले आहे असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
दिल्लीमधील जामिया येथे गोळीबार झाल्याची घटना ताजी असतानाच शाहीनबागमध्ये गोळीबार झाल्याने दिल्लीत वातावरण तापले आहे. धक्कादायक म्हणजे शाहीनबागमध्ये गोळीबार करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असता या देशात फक्त हिंदूंची चालणार, इतर कोणाची नाही असे वक्तव्य केले. पोलिसांना हा तरुण पूर्व दिल्लीचा रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.