nagar | आयुष्यमान भारत योजना विकास प्रक्रीयेचा भाग : ना.विखे पाटील

नगर (प्रतिनिधी) – आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करून पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आहे. आयुष्यमान भारत योजनेची अंमलबजावणी विकास प्रक्रियेचा भाग असल्याचे, प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शहरातील दिनदयाळ प्रतिष्ठान परीवार, दिनदयाळ नागरी सहकारी पतसंस्था आणि सुरभी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सर्वरोग निदान शिबीराचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी पंतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा, सुरभी रुग्णालयाचे चेअरमन अनिरूध्द देवचक्के, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.
पतसंस्थेने सभासदांकरीता सुरू केलेल्या हेल्थ कार्ड योजनेचा प्रारंभ करण्यात आला. आयुष्यमान भारत योजना सुरू करून यामाध्यमातून पाच लाख रुपयांपर्यत मोफत उपचार देण्याची अंमलबजावणी होत आहे. राज्य सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू त्यामध्येही सर्व अटी काढून पाच लाख रुपयांपर्यत उपचार मोफत देण्यात येतील.
यामध्ये काही ग्रामीण भागातील रूग्णालय चालकांनी बेडची अटीमध्ये बदल करण्याच्या केलेल्या मागणीबाबत राज्य सरकार निश्चित विचार करेल असे विखे पाटील म्हणाले. देशात आज आरोग्य सुविधला विकासाचा भाग बनविण्यात आले असून आरोग्य सुविधेला बळकटी देण्यासाठी मोठी गुंतवणूक होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.





