Shirur News : धार्मिक उत्साह, भक्तीभाव आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांचा अद्भुत संगम अनुभवायला मिळालेला “श्री शिवमहापुराण कथा” सोहळा शिरूरमध्ये ऐतिहासिक ठरला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथावाचक पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेला कथेच्या ६ व्या दिवशी लाखोंच्या संख्येने शिवभक्तांनी उपस्थिती लावली. एवढ्या मोठ्या प्रमाणात जमलेली गर्दी शिरूरच्या इतिहासात अभूतपूर्व मानली जात आहे. या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन पी. आर. धारीवाल फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले होते. फाऊंडेशनने केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे एवढ्या मोठ्या गर्दीतही कुठेही चेंगराचेंगरीची किंवा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नाही. व्यवस्थापनाची शिस्त आणि नियोजनशक्ती यामुळे हा कार्यक्रम अनेकांसाठी आदर्श ठरला. कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी वाहनांना ठराविक अंतरावर थांबविण्यात आले होते. जवळपास १५ ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. अनेक शिवभक्तांना सुमारे तीन किलोमीटर अंतर पायी चालत कार्यक्रमस्थळी यावे लागले. मात्र, भक्तांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावून चालत प्रवेश केला. वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र मदत केंद्रे उभारण्यात आली होती. तसेच २५ एकरवर तीन भागात भव्य मंडम व्यवस्था करण्यात आली होती. ती जागाही अक्षरशः अपूरी पडली भक्तगण बाहेर जिथे जागा मिळेल तेथे उभे राहून कथा श्रवण करत होते.स्वयंसेवकांकडून मार्गदर्शन, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षा यांचे उत्तम नियोजन करण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी एवढी गर्दी झाली की अक्षरशः जागा अपुरी पडली. परिसरातील रस्ते, मोकळी मैदाने आणि सभोवतालचा भाग शिवभक्तांनी भरून गेला होता. अनेक भक्तांना दूर उभे राहून कथाश्रवण करावे लागले, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि भक्तिभाव स्पष्ट दिसत होता. श्री शिवमहापुराण कथेमुळे संपूर्ण शिरूर शहर धार्मिक वातावरणाने भारावून गेले होते. ठिकठिकाणी भजन, हरिनाम, शिवजप आणि स्वागत फलकांनी शहर सजले होते. स्थानिक व्यापाऱ्यांनी व ग्रामस्थांनीही या सोहळ्यास उत्स्फूर्त सहकार्य केले. कार्यक्रमात सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्यात आली होती. पोलिस प्रशासन, स्वयंसेवक आणि आयोजक यांच्यात उत्तम समन्वय दिसून आला. वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली होती. त्यामुळे मोठ्या गर्दीतही वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण झाला नाही. या सोहळ्यामुळे धार्मिक कार्यक्रमांचे व्यवस्थापन कसे असावे याचा उत्तम आदर्श निर्माण झाला आहे. लाखोंची गर्दी असूनही शांतता, शिस्त आणि भक्तीभाव टिकून राहणे हीच या कार्यक्रमाची खरी यशोगाथा ठरली. स्थानिक नागरिकांच्या मते, “शिरूरमध्ये यापूर्वी अनेक मोठे कार्यक्रम झाले, मात्र एवढी प्रचंड गर्दी आणि एवढे सुरळीत नियोजन प्रथमच पाहायला मिळाले.” अनेकांनी हा सोहळा “ऐतिहासिक” असल्याचे मत व्यक्त केले. दि. ०२ मार्च रोजी ही कथा सकाळी ८ ते ११ रोजी होऊन सांगता होणार आहे. या शिवमहापुराण कथा सोहळ्यामुळे शिरूरची ओळख धार्मिक केंद्र म्हणून होऊ लागली आहे.