Shirur News : शिरूर तालुक्यात भिसीच्या नावाखाली महिला व पुरुष पोलिस कर्मचारी तसेच काही पोलिस अधिकाऱ्यांकडून विश्वास संपादन करून लाखो रुपये गोळा करून अनेकांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात काही पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनीही पैसे गुंतवल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस दलातही याची बऱ्याच दिवसापासून मोठी कुजबुज सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील एका महिलेने काही दिवसांपुर्वी विश्वास संपादन करून “विश्वासार्ह भिसी योजना” सुरू केल्याचे सांगत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना आकर्षित केले. नियमित मासिक हप्त्यांच्या स्वरूपात रक्कम जमा करून ठराविक कालावधीनंतर मोठी रक्कम परत मिळणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. सुरुवातीच्या काही महिन्यांत काही जणांना पैसे परत देऊन विश्वासार्हता निर्माण करण्यात आली. मात्र, नंतर अचानक देयके थांबविण्यात आल्याने संशयाची सुई फिरली. माहितीनुसार, या भिसीत सहभागी झालेल्या अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये गुंतवले होते. काहींनी तर वैयक्तिक बचत, तर काहींनी कर्ज काढूनही रक्कम भरल्याची चर्चा आहे. मात्र, अपेक्षित परतावा न मिळाल्याने सर्वांचेच आर्थिक गणित कोलमडले आहे. विशेष म्हणजे, ही भिसी अधिकृत परवानगीशिवाय आणि लेखी कराराशिवाय सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात सर्वात मोठी अडचण म्हणजे तक्रार नोंदविण्याचा प्रश्न. भिसीसाठी पैसे देणे हे अनेकदा अनौपचारिक स्वरूपात होत असल्याने आणि त्यात लेखी पुरावे कमी असल्याने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना उघडपणे तक्रार करता येत नसल्याची स्थिती आहे. तसेच काहींनी नेट बेकिंग द्वारे ही पैसे दिले आहे.आर्थिक नुकसान होऊनही अनेक जणअनाधिकृत भिसी लावल्याने मौन बाळगून असल्याचे चित्र आहे. सर्वांचे मिळून कोटींच्या वर रक्कम असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक व शिरूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक यांनी तातडीने चौकशी करून या प्रकरणातील सत्य बाहेर आणावे, तसेच पैसे गुंतवणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सविस्तर चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. संबंधित महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशीही भावना व्यक्त होत आहे. कायद्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलिसांनाच अशा प्रकारे गंडा बसल्याने नागरिकांमध्येही विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. भिसी, चिट फंड किंवा अनधिकृत आर्थिक योजनांबाबत जागरूकता असूनही अशा घटना घडत असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकारामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.