पिंपरी | ‘पांदण’ रस्ते उरले फक्त कागदावरच

नाणे मावळ, {अतुल चोपडे-पाटील}- मावळ तालुक्यामध्ये पांदण तसेच गाव अंतर्गत रस्त्यांचे अस्तित्व आता फक्त कागदावरच उरल्याचे दिसत आहे. काही गावांतील पांदण रस्ते नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तर, जिथे हे पांदण रस्ते आहेत,
ते चिखल मुक्त आणि सिमेंटचे कधी होणार, असा प्रश्न स्थानिक करत आहेत. बहुतांशी पांदण रस्त्यांवर शेजारील शेतकरी अथवा स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केल्याचे गंभीर चित्र आहे. पांदण रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने गावच्या जुन्या पाऊलखुणा नष्ट होताना दिसत आहेत.
मावळ तालुक्यात जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग, पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग मावळ तालुक्यातून जातात.
त्यामुळे बांधकाम व्यावसायिक, व्यापारी आदींना मावळचे आकर्षण वाढले आहे. या मंडळींनी मावळात गुंतवणूक वाढवली आहे. त्यातून अनेकांनी जमिनी विकत घेऊन उद्योग व्यवसाय उभारणी तसेच धरण जलाशयाजवळ रो-हाऊस, बंगले, फार्म हाऊस बांधले आहेत.
स्थानिकांच्या मदतीने पांदण रस्ते गायब –
धनदांडग्यांनी गावातील जागा बळकावताना जुणे रस्ते, पाउलवाटा यांच्यावर अतिक्रमण केलेले दिसते. हे अतिक्रमण स्थानिक पुढारी, जमीनदार यांच्या मदतीशिवाय होत नाही, हे वेगळे सांगायला नको. गावोगावी दिसणाऱ्या जुन्या पाऊलवाटा त्यामुळे दिसेनाशा झाल्या आहेत.
पूर्वी पांदण रस्त्यांचा वापर शेतकरी शेतातील अवजारे, बैल, जनावरे, शेती उपयोगी साहित्य यांची ने-आण करण्यासाठी करीत. परंतु हळूहळू हे पांदण रस्ते स्थानिक शेतकऱ्यांनी, नागरिकांनी बळकावले.
त्यामुळे जागोजागी तारेची कुंपणे झाली आहेत. सिमेंट, पत्र्यांच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. कुंपणे करताना विनापरवाना वृक्षांची कत्तल झाल्याने जुन्या पाऊलवाटा, पांदण रस्ते नामशेष झाले आहेत.
खेडे गावामध्ये सरकारी बाबूंना हाताशी धरुन स्थानिक नागरिक किंवा रस्त्या जवळील शेतकरीच पांदण रस्त्यावर अतिक्रमण करतानाचे चित्र दिसते. त्यामुळे हे रस्ते आता फक्त नकाशावर उरले आहेत किंवा जुण्या माणसांच्या आठवणीत उरलेले दिसतात.
कोंडीवडे ना.मा. येथील परिस्थिती
मागील अनेक वर्षांपासून कोंडीवडे ना.मा. या गावातील पांदण रस्ता चिखलमय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेताकडे जाताना मोठी कसरत करावी लागते.
शेतावर जाण्यासाठी चिखलातून जावे लागते. प्रशासनाने सदर गावातील पांदण रस्ता शेतकऱ्यांना येण्याजाण्यासाठी सोईस्कर असा सिमेंट काँक्रीटचा करावा, अशी मागणी स्थानिक शेतकरी सखाराम नामदेव चोपडे यांनी केली आहे.
गावातील पांदण रस्ता पक्का बनविण्यासाठी जो काही खर्च असेल तो ग्रामपंचायत आणि पंधराव्या वित्त आयोग मार्फत उपलब्ध निधीतून करता येतो.
याबाबत संबंधित अधिकारी वर्ग यांच्याशी चर्चा विनिमय करून गाव पांदन बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रिया कांब्रे गावचे सदस्य मारुती शंकर गायकवाड यांनी दिले.





