Pakistan Train Hijack: पाक सरकारने बलुचिस्तानला पाठवल्या 200 शवपेट्या; बीएलएने जारी केला ऑडिओ, ट्रेन अपहरणाचं सांगितलं कारण

Pakistan Train Hijack: बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमधील जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण केले आहे. बलुच लिबरेशन आर्मी (बीएलए) ने दावा केला आहे की त्यांच्याकडे 200 पेक्षा जास्त पाकिस्तानी लोक ओलिस आहेत. 28 तास उलटून गेले तरी पाकिस्तानी लष्कर काहीच करू शकलेले नाही. बीएलएने एक ऑडिओ जारी केला असून त्यात पाकिस्तानी लष्करावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पाकिस्तान रेल्वेने बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा येथे 200 हून अधिक शवपेटी पाठवल्या आहेत, यावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते.
बीएलएने जारी केलेल्या संदेशात काय म्हटले आहे?
बलुच लिबरेशन आर्मीने ट्रेन अपहरणामागील कारण सांगितले आहे. एका ऑडिओ मेसेजमध्ये बलूच फिदाईन म्हणाले की, ‘पाकिस्तानी लष्कराचे अत्याचार आणि बलुचिस्तान प्रांतातील संसाधनांचे शोषण यामुळे त्यांना हे पाऊल उचलण्यास भाग पाडले. अनेक दशकांपासून पाकिस्तानी लष्कराकडून त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. आपण लढत असलेली लढाई न्याय आणि अस्तित्वाची लढाई आहे. हे युद्ध बलुचिस्तानच्या माता-भगिनींसाठी आहे. मातृभूमीसाठी ते आपले रक्त सांडत आहेत.
बलुच लिबरेशन आर्मीचे प्रमुख अल्लाह नजर हे सुवर्णपदक विजेते डॉक्टर आहेत. बलुचिस्तान, जो पाकिस्तानचा सर्वात श्रीमंत प्रदेश आहे, तो आता सर्वात गरीब राज्य बनला आहे. या विद्रोहामागे अनेक दशकांपासून चालत आलेली गुलामगिरी आणि शोषणाची व्यवस्था आहे.
पाकिस्तान सरकारवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत
बलुचिस्तानमध्ये रेल्वे अपहरणाच्या अप्रिय घटनेवर पाकिस्तान सरकारच्या प्रतिक्रियेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पाकिस्तान सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 80 प्रवाशांची सुटका करण्यात आली असून 30 दहशतवादी मारले गेले आहेत. मात्र, सरकार परिस्थितीचे गांभीर्य लपवत असल्याचे बलुच नेत्यांचे म्हणणे आहे. 200 शवपेट्या पाठवण्याच्या वृत्ताने तणाव वाढला आहे. तज्ज्ञांचे मत आहे की पाकिस्तान सरकारचा प्रतिसाद अपुरा आहे आणि परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहे.





