Pahalgam Attack : पहलगाम प्रकरणी याचिका दाखल करणाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

नवी दिल्ली – जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला. या पाश्र्वभूमीवर एका व्यक्तीने पर्यटकांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारले. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने याचिकेवर सुनावणी केली.
यादरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रसिद्धीचा स्टंट असे नमूद करत ही याचिका फेटाळून लावली. तुम्ही ही याचिका का दाखल केली आहे? तुमचा खरा हेतू काय आहे? तुम्हाला या प्रकरणाची संवेदनशीलता समजत नाही का? अशी विचारणा न्यायालयाने याचिकाकर्त्याला केली.
याचिकाकर्त्याच्या वकिलाने न्यायालयात स्पष्टीकरण देताना म्हटले की, जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना लक्ष्य केले गेले आहे. म्हणूनच, पर्यटकांच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
यावर प्रतिक्रिया देताना सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले की, याचिकाकर्ते एकामागून एक अनेक याचिका दाखल करत आहेत. यावरून असे दिसून येते की त्यांचे प्राथमिक ध्येय कोणताही सार्वजनिक हिताचा मुद्दा उपस्थित करणे नाही तर प्रसिद्धी मिळवणे आहे.





