P. Chidambaram : बिहारमध्ये जातनिहाय जनगणना झाल्यानंतर देशात सर्वच राज्यातून अशा प्रकारच्या जनगणनेची मागणी करण्यात येऊ लागली आहे. त्यातच आता माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जातनिहाय जनगणना(Cast Census ) केली गेली पाहिजे. कारण त्यामुळे समाजातल्या विविध जातींसाठी विशिष्ट कोटा ठरवण्यास मदत मिळू शकेल असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. रायपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात पी. चिदंबरम यांनी जातनिहाय जनगणनेविषयी वक्तव्य केले आहे. यावेळी चिदंबरम यांनी बोलताना “आपल्या देशात किती वाघ आहेत? आपल्या देशात किती हत्ती आहेत? यांची गणना जर होते तर मग जातनिहाय जनगणना का होऊ शकत नाही? देशाला हे माहित हवं की आपल्या देशात किती लोक अनुसूचित जातीचे? किती लोक अनुसूचित जमातीचे, किती लोक ओबीसी आहेत? हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा जातनिहाय जनगणना केली जाईल. जातनिहाय जनगणना केली नाही तर हे सरकार कुठल्या आधारांवर आरक्षण देणार आहे?” असाहीथेट सवालही पी चिदंबरम यांनी विचारला आहे. पुढे बोलताना चिदंबरम यांनी, “जे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना १० टक्के आरक्षण द्यायचं असेल तरीही जातनिहाय जनगणना करणं आवश्यक आहे. आपला देश वाघ किती आहेत आणि हत्ती किती आहेत यांची गणना करतो. अशात हे सरकार जातनिहाय जनगणना का करु शकत नाही? जर ती करण्यात आली तर आरक्षणाचा मार्ग सोपा होईल. त्यामुळे आपण प्रत्येकानेच जातनिहाय जनगणनेच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे आणि ती लवकर करा अशी मागणी सरकारकडे केली पाहिजे.” असे त्यांनी म्हटले आहे. देशातले जे कृषी क्षेत्र आहे ते टिकवण्यासाठी आणि बळीराजाला टिकवण्यासाठी सरकारने आणखी एकदा कर्जमाफी दिली पाहिजे. छत्तीसगढचे बहुतांश नागरिकांचा व्यवसाय शेती आहे. राज्याच्या जीडीपीमध्ये ३२ टक्के वाटा हा शेती क्षेत्राचा आहे. अशावेळी शेतकऱ्यांना मदत करणं, त्यांना कर्जमाफी देणं हे आवश्यक आहे असेही पी. चिदंबरम यांनी यावेळी म्हटले आहे.