पीएमपीच्या ताफ्यातून 77 बसेस वगळल्या

पुणे – वारंवार “ब्रेकडाऊन’ होणाऱ्या बसेसमुळे प्रवाशांच्या मानसिक त्रासाबरोबरच पीएमपी प्रशासनाला आर्थिक फटका सहन करावा लागत होता. अशा डोकेदुखी ठरणाऱ्या ठेकेदारांच्या 77 बसेस पीएमपीच्या ताफ्यातून काढण्यात आल्या आहेत.
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या एका बसचे दररोजचे किमान उत्पन्न 10 हजार रुपयांपर्यंत व्हावे, अशी अपेक्षा असते. पण, या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होणार आहे. मात्र, ही कार्यवाही आवश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
पीएमपीच्या बंद पडणाऱ्या बसेसचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा उपाययोजना करून देखील ब्रेकडाऊन होणाऱ्या बसेसचे प्रमाण “जैसे थे’च असल्याचे चित्र संपूर्ण शहरामध्ये दिसते. शहरामध्ये बसेस बंद पडून वाहतूक कोंडी झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला होता. यामुळे पीएमपीच्या कारभाराबाबत रोष व्यक्त करण्यात येत होता. याबाबत ठेकेदारांनी नादुरुस्त बसेस रस्त्यांवर आणू नयेत, अशा सूचना पीएमपीने अनेकदा दिल्या. मात्र, ठेकेदारांनी याकडे दुर्लक्ष केले. ठेकेदारांच्या बसेस बंद पडल्यावर कारवाई करण्यात येते. तरी देखील या बसेसची संपूर्ण दुरुस्ती न करता बसेस वारंवार बंद पडत आहेत. याबाबत प्रवाशांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. याची दखल घेत गेल्या चार महिन्यांमध्ये पीएमपीने या 77 बसेस काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.





