- माजी खासदार तथा रेशनिंग फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांचा इशारा
- राजकीय हस्तक्षेप, बदनामी थांबवा
पिंपरी – राज्यातील रेशनदुकानदारांना सातत्याने मारहाण, दमबाजी, बदनामी अशा प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. तर पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय व्यक्तींचा रेशनिंग दुकानांच्या वितरण प्रणालीमध्ये हस्तक्षेप वाढत आहे. हे वाढते प्रकार तात्काळ थांबवून दुकानदारांना संरक्षण न दिल्यास येत्या 1 मे पासून शासनाकडून धान्य उचलणे बंद केले जाईल, असा इशारा माजी खासदार तथा ऑल महाराष्ट्र रेशनिंग शॉपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी दिला आहे.
बाबर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन पाठविले असून त्यात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत आहे.
स्थानिक राजकीय नेते रेशनिंग दुकानदारांवर दबाव आणत असून धान्य आमच्या ताब्यात द्या, आम्ही वाटप करू अशी धमकी देत आहेत. शिवाय अधिकाऱ्यांसमक्ष अशा गोष्टी घडू लागल्या आहेत. हे कायद्याच्या बाहेर असून शासनाच्या चौकटीत बसते का ते जाहीर करावे. तसेच चेंबूर, त्रंबकेश्वर (पेगलवाडी) व मावळात रेशनिंग दुकानदारांना मारहाणीच्या घटना घडल्या असून समाजकंटकांकडून दुकानदारांची सोशल मीडियावर बदनामी सुरू आहे.
भिवंडी येथील राजकीय पदाधिकाऱ्यांकडून दुकानदारांना अरेरावी करण्यात आल्याने सर्व ठिकाणच्या दुकानदारांमध्ये भितीचे वातावरण असून मानसिक स्थिती बिघडत आहे. सर्वांना धान्य मिळावे ही फेडरेशनची इच्छा आहे.
मात्र सातत्याने निर्माण होत असलेल्या दहशतीकडे शासनाने कडेच वेळीच लक्ष द्यावे तसेच दुकानदारांना संरक्षण द्यावे, अन्यथा 1 मे 2020 पासून आम्ही शासनाकडून धान्य उचलणे बंद करू याची नोंद शासनाने घ्यावी, असेही या निवेदनात बाबर यांनी म्हटले आहे.