“नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार…पवार’ असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल”

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर भाजपा-शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दरम्यान, यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राऊतांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रातून पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी योगा करावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
संदीप देशपांडे यांनी पत्रात,“तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजी पोटी हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. तुम्ही कितीही नाकारलं तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी”, असे म्हटले आहे.
पटलं तर घ्या pic.twitter.com/JBKzf0Eb3H
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2023
पुढे पत्रात संजय राऊतांना सल्ला देताना, “आपण रोज जी पत्रकार परिषद घेता, त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का? ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या १० ते १५ मिनिटे पूर्वी योगा करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल”, असा खोचक टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
आणि यात सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली, ही सल मनाला लावून घेतली आहे. ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही तेवढेच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या, नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर ‘पवार…पवार’ असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच! पटलं तर घ्या, नाही पटलं तर चु%^* आहे असं म्हणून विसरून जा, असे ते म्हणाले.





