Amol Mitkari : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ने गुरुवारी मोठी कारवाई करत राज्याचे अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या मंत्रालय कार्यालयातील लिपिकाला लाज घेताला रंगेहाथ पकडले. या घटनेनंतर प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आलोसे राजेंद्र ढेरंग असे ताब्यात घेतलेल्या लिपिकाचे नाव आहे. या घटनेनंतर या खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या प्रतिमेवर प्रश्निचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील विरोधी पक्षांनी केली आहे. अशातच आता या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत शंका उपस्थित केली आहे. नरहरी झिरवळ हे निर्दोष असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला आहे. या प्रकरणात नरहरी झिरवाळ यांना बदनाम करण्याची सुपारी कोणी घेतली आहे, हे लवकरच समोर येईल. नरहरी झिरवळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आदिवासी समाजातील सर्वसामान्य जनतेचा चेहरा आहेत. त्यांनी काहीही चुकीचं केलं नाही, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे. या कारवाईनंतर एसीबीने नरहरी झिरवळ यांचे कार्यालय सील केले आहे. या लाचेच्या व्यवहाराचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या लिपिकाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नरहरी झिरवळ नेमंक काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, एका परवाना नूतनीकरणाच्या कामासाठी मंत्री झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यापैकी ३५ हजार रुपये गुरुवारी स्वीकारण्याचे ठरले होते. याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर राजेंद्र ढेरंग याला लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. मंत्री नरहरी झिरवळ काय म्हणाले? संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री नरहरी झिरवळ यांनी दिली. या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे. राजीनाम्याची मागणी अजित पवार यांच्या निधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका मंत्र्याच्या दालनातच अशा प्रकारे लाचखोरीचे प्रकार समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे महायुतीवर विरोधकांकडून टीका केली जात असून, शिवसेना ठाकरे गटाने नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हेही वाचा : Pune Zilla Parishad : भोरला ४४ वर्षांनंतर मिळणार झेडपीचे अध्यक्षपद ? ‘या’ नेत्याच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा