शीख दंगलीवरुन राहुल गांधी यांच्यावर विरोधकांचा पुन्हा निशाणा; माफीच्या मागणीवर म्हणाले,“शीखांचे योगदान नसते तर..”

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ पंजाबमधून पुढे सरकत आहे. दरम्यान, या ठिकाणी यात्रा आली असता पुन्हा एकदा ऑपरेशन ब्लू स्टार आणि १९८४ च्या शीख दंगलीबाबत विरोधकांकडून राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत यासाठी राहुल गांधी यांच्या माफीची पुन्हा एकदा मागणी केली आहे. त्यावरच आता राहुल गांधी यांनी विरोधकांना उत्तर देत शीख दंगलीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
विरोधकांनी केलेल्या मागणीवर भारत जोडो यात्रेत बोलत असताना राहुल गांधी म्हणाले, “शीखांचे योगदान नसते तर हा भारत, भारत राहिला नसता. याआधी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शीख दंगलीबाबत दुःख व्यक्त करत माफी मागितली आहेच. मी त्यांच्या भूमिकेशी सहमत आहे.”
दरम्यान, राहुल गांधी यांनी,’माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी १९८४ च्या दंगलीबाबत संसदेतच भूमिका स्पष्ट केली आहे. ऑगस्ट २००५ साली मनमोहन सिंह यांनी दंगलीबाबत बोलत असताना म्हटले की, मला केवळ शीख समुदायाचीच नाही, तर संपूर्ण देशाची माफी मागायची आहे. त्यावेळी देशाच जे काही झाले, त्याने माझी मान शरमेने खाली जाते. १९८४ ची ती घटना आपल्या संविधानाने दिलेल्या अधिकाराचे हनन करणारी होती. तसेच जेव्हा १९८४ च्या दंगली घडत होत्या. त्यावेळी संध्याकाळी एल के गुजराल हे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. व्ही. नरसिंहराव यांना येऊन भेटले होते. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात यावे, अशी मागणी केली. जर सैन्याला लवकर बोलावले असते, तर कदाचित १९८४ ची दंगल थांबवता आली असती.”असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देखील १९९८ मध्ये बोलत असताना त्या घटनेबाबत दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “मी स्वतः या दंगलीचा अनुभव घेतला आहे. या हिंसक घटनांमुळे मी माझ्या सासू आणि पती राजीव गांधी यांना गमावले आहे.” आपण सामूहिक रुपात जे गमावले त्याची आठवण काढून आता उपयोग नाही. कोणतेही सांत्वनाचे शब्द जुन्या दुःखावर फुंकर घालू शकत नाहीत. इतरांची सांत्वना ही नेहमीच रिती असते. माझ्या घरातील तीन पिढ्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले आहे, असंही त्या म्हणाल्या होत्या. तसेच राहुल गांधी यांनी देखील २०१४ मध्ये सांगितले होते की, मी मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी या दोहोंच्या भूमिकेशी सहमत असून मी त्याबद्दल दुःख व्यक्त करतो. निरपराध लोकांचा बळी जाणे ही भयावह बाब असून, असे व्हायलाच नको होते.
भारत जोडो यात्रा जेव्हा पंजाब येथे १० जानेवारी रोजी आली तेव्हा राहुल गांधी यांना विरोध झाला. काँग्रेसच्या लुधियाना येथील कार्यालयावर काही अज्ञातांनी फलक चिटकवून १९४७ साली झालेली फाळणी आणि १९८४ सालच्या दंगलीबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रश्न विचारले. १२ जानेवारी रोजी जेव्हा राहुल गांधी लुधियाना येथे पोहोचले तेव्हा दंगलीतील पीडित कुटुंबियांनी निषेध करत त्यांचे पुतळे जाळले तसेच राहुल गांधींनी दिलगीरी व्यक्त करावी, अशी मागणी शीख समुदायाकडून करण्यात आली.





