Manoj Jarange : आता मुंबईत येऊन बदला घेणार.! मनोज जरांगेंचा एकनाथ शिंदेंना थेट इशारा
जर सरकारने १२ सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या, तर मुंबईत प्रस्तावित उपोषण करण्याची गरज भासणार नाही, असे जरांगे यांनी सांगितले.

Manoj Jarange – परभणीत होत असलेल्या मेळाव्यावर माझा आक्षेप नाही. पण या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत आहेत. कार्यक्रमाला प्रतिष्ठा नव्हती, मराठा समाजाची प्रतिष्ठा होती. पडक्या घरात गेलात.
आपल्यातच नेत्याला बाप मानणारे आहेत. पण मी मुंबईतून पळवून लावतो, तर इथे परभणीच काय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेले आव्हन मी स्वीकारले, आता मुंबईत येऊन बदला घेणार, असा थेट इशारा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे.
परभणी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शेतकरी आणि युवा मेळावा त्वरित रद्द करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली. तसेच हा कार्यक्रम रद्द न केल्यास आपण स्वतः तिथे उपस्थित राहू, असा इशाराही त्यांनी दिला. जरांगे म्हणाले, येऊ नका सांगूनही एकनाथ शिंदे मुंबईतून परभणीला निघाले आहेत.
आता श्रीमंत मराठ्यांना गरीब मराठ्यांची गरज नाही का? असा सवालही त्यांनी केला. दुसरीकडून गेल्याने पक्षाची ताकद वाढत नसते. जे गेले त्यांना जाऊ द्या,आता पहिल्या उमेदवाराचे दिवस येतील. असा इशारा देत खासदार बंडू जाधवांनाही जरांगेंनी इशारा दिला.
रक्ताचा असून मराठ्यांच्या जीवावर नाचत आहेत. जाधव यांनी मराठ्यांसाठी काय केले? उगाच जाळात कशाला हात घालतो. शेवटी बच्चू कडू यांचा फोन आला. एकदा बघा म्हणे तुमचे ऐकतात का.
बच्चू कडू म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना वाईट वाटले. हा कार्यक्रम मराठ्यांच्या विरोधात नाही. जाधव यांनी घेतला असेल त्या उद्देशाने तर मला माहिती नाही, असे शिंदे म्हणाल्याचे बच्चू कडूंनी सांगितले.
शिंदे पोहचले नसतील तर रद्द करा म्हंटले, पण वेळ पुरणार नाही म्हणून मी गेलो नाही. मात्र मुद्दाम खुन्नस देण्यासाठी कार्यक्रम घेत आहेत. असे कार्यक्रम घ्यायचे नाहीत. मराठ्यांचे मन दुखावून असे कार्यक्रम घेतले नाही पाहिजेत. असेही जरांगे म्हणाले.
उपमुख्यमंत्री शिंदे हे हेलिकॉप्टरने परभणी येथे जाणार आहेत. परभणी येथे जाधव यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी जाणार आहेत. यादरम्यान नांदेड विमानतळाच्या गेटबाहेर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली आहे.
तर मुंबईकडे कूच करणार…
मराठा आरक्षणाशी संबंधित मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाचा दुसरा दिवस असताना, आंदोलक मनोज जरांगे यांनी सर्व मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर ठाम भूमिका घेतली.
राज्य सरकारने यावर कार्यवाही न केल्यास मुंबईकडे कूच करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. जरांगे यांनी शनिवारी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी ११ वे बेमुदत उपोषण सुरू केले.
त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समाजातील हजारो लोक तिथे जमा झाले आहेत. जरांगे म्हणाले, मुंबईत उपोषण करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी १२ सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीत मराठा समाजाच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
जर सरकारने १२ सप्टेंबरपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या, तर मुंबईत प्रस्तावित उपोषण करण्याची गरज भासणार नाही, असे जरांगे यांनी सांगितले.





